राज्यात शिक्षक-पदवीधर निवडणूक निकालाचे ढोल वाजविले जात आहे. खरेतर प्रत्येक निवडणूक प्रतिष्ठेची झाल्यामुळे आजची स्थिती निर्माण झाली आहे.
शिक्षक-पदवीधरांच्या निवडणुका झाल्या. मविआ जिंकली. भाजप हरल्याचा ढोल गावभर पिटला गेला. एरवी कधीही महत्त्व न दिलेल्या या निवडणुकीची चर्चा भाजपामुळे झाली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. राज्यभर पसरलेल्या, भाजपची ताकद मोठी असल्यामुळे त्यांना पाच मतदारसंघापैकी दोन जागी विजय मिळाला, तर तीन ठिकाणी मविआने झेंडा रोवल्याने त्यांचे नको तितके गुणगान गाण्यात प्रसारमाध्यमे दंग झाली. त्यामुळे आता नागरिकांचे लक्ष आगामी निवडणुकांकडे लागले.
अर्थात, त्यामुळे भाजपचे फारसे बिघडणार नाही. भाजप व बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या युतीची सत्ता मविआ हिसकावून घेईल इतकी ताकद मविआत नाही; परंतु त्यांचे इतके कौतुक जणू काही देशांच्या लोकसभा किंवा राज्यसभा जिंकल्यासारखे केले गेले. यापूर्वीच्या राज्यसभा व विधानपरिषद निवडणुकांत भाजपने विजय मिळवला तेव्हाही इतका बोलबाला झाला नव्हता, तितका आता केला गेला. तेव्हा माध्यमांना समजाविण्यासाठी मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? हा प्रश्न पडतो.
भाजपाने मात्र याकडे फारसे लक्ष दिले नाही. प्रत्येक निवडणूक प्रतिष्ठेची करायला नको हे या शिक्षक व पदवीधर निवडणुकांमुळे त्यांच्या लक्षात आले असेलच म्हणून ते दखल घेत नव्हते. पण त्यांना आत्मचिंतन करण्यासाठी धावपळ मात्र करावी लागली. राज्यातील बहुतेक सर्व प्रमुख नेते रात्रीच प्रदेश कार्यालयात जमा होऊन आत्मचिंतन करू लागले. कोअर कमिटीची बैठकच उशिरापर्यंत चालल्याचे सांगण्यात येत होते. त्यात त्यांना शिक्षकांच्या जुन्या पेन्शन योजनेस विरोध केल्याचे स्मरल्याचा मुद्दा पुढे आला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी ही योजना बंद केली होती. त्याचा फटका शिक्षक भारती सेनेच्या सदस्यांस म्हणजे भाजप व बाळासाहेबांच्या शिवसेनेचा पुरस्कृत उमेदवार नागो गणार यांना बसल्याचे जाणवले. याच पेन्शन योजनेने हिमाचल प्रदेशात भाजपला हात दाखवत त्यांच्या विरोधकांची सत्ता आणली होती व शत-प्रतिशत भाजपच्या नाऱ्याला तेव्हा सुरूंगही लागला होता. हे त्यामुळे विसरून चालण्यासारखे नाही.
अमरावतीतही भाजपचे माजी मंत्री रणजीतसिंह पाटलांचा मविआच्या धीरज लिंगाडेंनी पराभव केला. दुसऱ्या फेरीतील मतापर्यंत झुंज देताना मातब्बर पाटलांबरोबर भाजपचा श्वास फुलेल अशी परिस्थिती होती. अखेर लिंगाडेंनी पराभव केल्याचे पाटलांनी मान्य केले. इथे मुद्दे असे कोणतेच नव्हते; परंतु अमरावतीच्या लिंगाडेंचे कार्य गेल्या पाच वर्षांत फुलले होते. कॉंग्रेस व राष्ट्रवादीने इथे झोपा न काढता काम केले म्हणून मविआ जिंकू शकली, हे मात्र मान्य करावेच लागेल. हीच स्थिती औरंगाबादमध्ये होती. राष्ट्रवादीचे तीन टर्मचे आमदार विक्रम काळे विजयी झाले. त्यांनी भाजप-बाळासाहेबांच्या शिवसेनेचा उमेदवार किरण पाटील यांना सहज धूळ चारली. अर्थात, काळेंचे राष्ट्रवादी कॉंग्रेसपेक्षाही कार्य खूप आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांसारखे म्हणू शकतो.
नाशकांत मात्र मविआ ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या शुभांगी पाटील याच्यांसाठी फुरफुरत होती. तेथे काही चमत्कार वगैरे घडवू शकली नाही. तिथे अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबेंनी त्यांचा सहज पराभव केला. गेली दहा वर्षे युवा नेता म्हणून परिचित असणाऱ्या सत्यजीत यांचा त्यांच्या कॉंग्रेस पक्षानेच उमेदवारी न देता घाव घातला. त्यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांना पहिले उमेदवारी दिली. नंतर सत्यजीत यांना पक्षातूनच हाकलले. याचा फायदा घेत भाजपने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पॅटर्न वापरत सत्यजीत यांना खेचण्याचा प्रयत्न केला. ते कितीही नाकारत असले तरी मंत्री चंद्रकांत पाटील यांचे पाठिंबा देण्यासाठी बाहू स्फुरले होते. पण मामा बाळासाहेब थोरातांच्या प्रेमाला सत्यजीत यांनी हुंकार देत अपक्ष लढणे पसंत केले. मात्र, त्यामुळे सत्यजीत परत कॉंग्रेसमध्ये जातील अशी परिस्थिती नाही. सध्या राजकारणात “देवेंद्रबाबू का जादू चल गया’ अशी परिस्थिती आहे. हेही इथे ध्यानी घ्यावे लागेल.
कोकणात मात्र भाजपने 20 वर्षांनंतर ही जागा शेकापसारख्या बलाढ्य पक्षांकडून खेचून घेतली. मविआचा तगडा पाठिंबा त्यात बाळाराम पाटील यांच्यासारखा दुसऱ्यांदा निवडणूक लढविणारा बलशाली उमेदवार असतानाही ज्ञानेश्वर म्हात्रेंनी त्यांच्यावर लीलया मात केली. शेकापचं जयंत पाटील पराभवानंतर भाजपचे कार्य मानतच नाही. त्या मतदारसंघातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कार्य केल्यामुळे भाजपला विजयश्री खेचता आल्याचे छातीठोकपणे सांगताहेत. या मतदारसंघातील पालघर, ठाणे व रायगड या भागांत शिंदेंनाच मानणारा नगरसेवक आहे. त्यामुळे इथे मविआतील उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रभाव टाकू शकली नाही.
तथापि, शिक्षक पदवीधरांत तीन ठिकाणी विजयी झालेली मविआ पार फुलली. अंगावरली सूज आहे की मेहनतीने या जागा त्यांना मिळाल्या हे त्यांचे त्यांनाच सांगता येत नाही. या विजयामुळे “कॉंग्रेस के मनमें लड्डू फूटे’ ही जाहिरात आठवली. दादरच्या टिळक भवनात दिवसभर नाचून त्यांनी जल्लोष केला होता. पण यावेळी त्यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंप्रमाणे भाजपला फरशीवर आणल्याचा विनोद करत थट्टा केली.