नुकतेच बहुचर्चित “समृद्धी महामार्गा’चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. आता समृद्धी महामार्गाच्या वेगाने महाराष्ट्राचीही प्रगती उत्तरोत्तर होत जाईल. “समृद्धी महामार्ग’ महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरावा.
महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या मुंबई ते नागपूरदरम्यानच्या समृद्धी महामार्गाचा काही टप्पा जनतेसाठी खुला केला आहे. “नागपूरहून सुरू होणाऱ्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरून गाडी अशी धावते की वाटतं ही सफर कधी संपूच नये. सुसाट आणि सुरक्षित’ असे ट्विट फडणवीस यांनी टेस्ट ड्राइव्हनंतर केले होते. समृद्धी महामार्ग विदर्भ मराठवाड्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणार आहे. पुणे-मुंबई-नाशिक सुवर्ण त्रिकोणाच्या पलीकडे महाराष्ट्राच्या विकासाला नेणारी एक समृद्ध वाट या महामार्गाच्या रूपाने खुली झाली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांचे एक सुप्रसिद्ध वाक्य आहे, “अमेरिका प्रगत आहे, म्हणून तिथले महामार्ग उत्तम नाहीत, तर तिथले महामार्ग उत्तम आहेत म्हणून अमेरिका प्रगत आहे.’ देशाचे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे सातत्याने आपल्या भाषणांमधून, सभांमधून हे वाक्य सांगत असतात आणि त्यांनी ते दिल्लीतील त्यांच्या कार्यालयामध्येही फ्रेम करून लावले आहे. रस्ते हा विकासाचा मार्ग असतो. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी दळणवळणाच्या सुविधा महत्त्वाची भूमिका बजावत असतात. रस्त्यांचा विकास ज्या-ज्या भागांत झालेला आहे त्या-त्या भागांतील, प्रदेशातील, गावांतील, खेड्यांतील आर्थिक क्रियांना गती मिळाल्याची असंख्य उदाहरणे आहेत. याउलट चांगल्या रस्त्यांची सुविधा नसणाऱ्या भागांत आजही विकासाची गंगा वाहताना दिसत नाही. त्यामुळेच केंद्र सरकारने देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले. विशेषतः महामार्गांचे जाळे विकसित करून देशातील अर्थकारणाची केंद्रे परस्परांशी जोडण्यावर अधिक भर देण्यात आला.
महाराष्ट्रात युती सरकारच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने नितीन गडकरी यांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे पूर्ण केला आणि कालांतराने देशात अशाच प्रकारच्या महामार्गाची उभारणी होऊ लागली. या महामार्गामुळे पाच-सहा तासांचा मुंबई-पुणे प्रवास हा दोन ते अडीच तासांवर आला. या महामार्गामुळे ही दोन महानगरेच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्र अणि कोकणही जोडले गेले. मुंबईहून पुण्याला काही वर्षांपूर्वी विमानसेवा होती. तिची गरज या महामार्गाने संपुष्टात आणली. त्यापुढचे पाऊल टाकत महाराष्ट्राची उपराजधानी असणारे नागपूर आणि देशाची आर्थिक राजधानी असणारी मुंबापुरी यांना जोडणाऱ्या “समृद्धी महामार्गा’ची योजना आखण्यात आली. पंतप्रधान मोदी यांनी 2018 मध्ये या कामाचा शुभारंभ केला होता. आता नागपूर ते शिर्डी या टप्प्याची चाचणी घेतल्यानंतर हा मार्ग खुला करण्यात आला आहे. येत्या काही महिन्यांत हा मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. या महामार्गामुळे दोन मोठ्या महानगरांदरम्यानचा प्रवासाचा वेळ निम्म्याने कमी होणार आहे. एवढेच नाही तर दहा जिल्हे आणि परिसरातील चौदा जिल्हे, 26 तालुके आणि चारशे खेडी समृद्धी महामार्गामुळे जोडली जाणार आहेत.
महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा अणि विदर्भ हे चारही विभाग आपल्या भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे वेगळे आहेत. पण हे चारही विभाग या महामार्गामुळे जोडले जाणार आहेत. नागपूर ते मुंबई प्रवास हा 8 तासांत आणि मालवाहतूक 16 तासांत शक्य होईल. राज्यातील 26 तालुक्यांमधून आणि 392 गावांमधून हा सहा पदरी महामार्ग जात आहे. हा महामार्ग काटेपूर्णा (अकोला), कारंजा (वाशीम), तेन्सा (ठाणे) अशा तीन अभयारण्यांतून जाणार आहे. परंतु या भागातील प्राण्यांना कोणतीही हानी होऊ नये यासाठी अंडरपासची देखील सोय करण्यात आली आहे. असे एकूण 209 अंडरपास समृद्धी महामार्गावर आहेत. हे देखील या प्रकल्पाचे एक वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. याशिवाय झिरो ऍक्सिडेंटल कॉरिडोर असणारा हा देशातील पहिलाच महामार्ग ठरेल, असे म्हटले जात आहे.
समृद्धी महामार्गावर वाहनांसाठीची वेगमर्यादा घाटामध्ये कमाल शंभर किलोमीटर प्रतितास आणि सपाट मार्गावर दीडशे किलोमीटर प्रतितास ठेवण्यात आली आहे. महामार्गावरील टोलनाक्यांमुळे वाहनांच्या गतीला ब्रेक लागतो, असे म्हटले जाते. मात्र, नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावर कोणत्याही प्रकारचे टोलनाके असणार नाहीत. मात्र, या संपूर्ण प्रवासामध्ये ज्या शहरांसाठी आगमन निर्गमन द्वारे आहेत त्या ठिकाणी 24 टोलनाके आहेत. या महामार्गावर 18 ठिकाणी कृषी समृद्धी केंद्राची निर्मिती केली जाणार असून त्याठिकाणी शेतीला पूरक उद्योग असतील. औद्योगिक उत्पादनासाठी काही भूखंड राखीव असतील. एका कृषी समृद्धी केंद्रात 30 ते 60 हजार जणांना प्रत्यक्ष रोजगाराची संधी मिळेल. भविष्यात 15 ते 20 लाख नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आहे. कसारा घाटात म्हणजे इगतपुरीजवळ देशातील सर्वांत रूंद म्हणून ओळखले जाणारे बोगदे तयार केले गेले आहेत. सध्या कसारा घाट ओलांडण्यासाठी अर्धा तास लागतो. मात्र या कामामुळे पाच मिनिटांत घाट पार करता येणार आहे.
खरे पाहता, मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश या विभागांचा कायापालट करणारा, समृद्धी आणणारा एक मार्ग असावा असे स्वप्न विलासराव देशमुख यांनी पाहिले होते. मुख्यमंत्री असताना या महामार्गाची कल्पना त्यांनी सर्वप्रथम मांडली होती. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या कल्पनेला मूर्तरूप दिले. 2015 मध्ये मुंबईत विधिमंडळ अधिवेशनात या महामार्गाची घोषणा करण्यात आली. अर्थातच हा मार्ग म्हणजे शिवधनुष्य होते. या महामार्गाचे काम लवकर करण्यासाठी 16 उपविभागात भाग करून कामाला सुरुवात करण्यात आली. तसेच कोणत्याही गावाला, शहराला महामार्गाची अडचण ठरू नये याची काळजी घेण्यात आली. जमीन हस्तांतराच्या वेळी काही शेतकऱ्यांनी विरोध केला. मात्र चोवीस तासांच्या आत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात आरटीजीएसच्या माध्यमातून मोबदल्याचे पैसे जमा करण्यात आले आणि जमीन हस्तांतरीत झाली.
या महाकाय प्रकल्पासाठी निधी कोठून आणायचा हा सरकारसमोरचा यक्षप्रश्न होता. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यावेळी नगरविकास मंत्री होते. त्यांनी लॅंड सेक्युरी डायजेशनची संकल्पना मांडली. याअंतर्गत सरकारची नेपेन सी रोडची जागा, वांद्रे येथील जागा, कफ परडेची जागा एमएसआरडीसीच्या नावे करण्यात आली. त्याची किंमत 50 हजार कोटी एवढी निश्चित करण्यात आली. लॅंड सिक्युरिटीज म्हणजे सरकारने त्यांच्याकडील असलेली जमीन बॅंकेकडे गहाण ठेवायची अणि त्या बदल्यात बॅंकांनी अर्थसाहाय्य करायचे. यानुसार 20 ते 25 हजार कोटींची रक्कम शासनाने उभी केली. ही जमीन केवळ तारण हमी म्हणून बॅंकांकडे राहील मात्र प्रत्यक्ष ताबा हा सरकारकडेच राहील, असे ठरविण्यात आले.
प्रारंभी या महामार्गाचे नाव “कम्युनिकेशन सुपर एक्स्प्रेस वे’ असे करण्यात आले होते. मात्र, या महामार्गामुळे महाराष्ट्रात समृद्धी येणार, शेती व्यवसायाला फायदा होणार, नाशिक, पुणे यांच्याबरोबरच विदर्भातला शेतीमाल मुंबईत पोहोचणार आणि एक प्रकारे देशात समृद्धी येणार हे पाहून या महामार्गाचे नाव समृद्धी महामार्ग असे करण्यात आले. या महामार्गामुळे लोणार सरोवर, वेरूळ-अजिंठा लेणी, पेंच राष्ट्रीय उद्यान, शेगाव, सेवाग्राम, शिर्डी, दौलताबाद, औरंगाबादचा बिबी का मकबरा, पंचवटी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी ही पर्यटनाच्या दृष्टीनं महत्त्वाची असणारी स्थळं जोडली जाऊन पर्यटनाला चालना मिळणार आहे.
समृद्धी महामार्गामुळे प्रवास सुखकर आणि वेगात होणार असला तरी महामार्गालगतच्या नागरिकांचे, ग्रामस्थांचे हित पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. महामार्गामुळे होणारा विकासाचा स्पर्श हा ग्रामस्थांना कसा होईल, याचाही विचार करायला हवा. या मार्गावर केवळ खासगी वाहने धावू नयेत तर सार्वजनिक वाहनांची संख्या देखील वाढवणे गरजेचे आहे. शिवनेरीसारख्या बसेसची संख्या वाढवल्यास सामन्यांना देखील समृद्धी महामार्गावरील वेगाचा आनंद अनुभवता येईल. याखेरीज महामार्गालगत वनराई तयार करणे, शेततळी उभारण्याचा सरकारचा मानस आहे. आता या कामाकडे राज्य सरकारने अधिक लक्ष दिले तर परिसरातील लोकांच्या जीवनांचा कायापालट होऊ शकतो.