– अरुण गोखले
घटिक गेली पळे गेली, तास वाजे ठणाणा।
आयुष्याचा नाश होतो, राम कारे म्हणा ना?
साधूू, संत आणि महंतांनी कितीही कानी कपाळी ओरडून सांगितले, अज्ञानाच्या निद्रेत असलेल्या जीवाला जागे करण्याचा प्रयत्न केला, तरी तो जागा होतोच असे नाही. मानवी जीवनाची क्षणभंगूरता लक्षात न घेता, त्या अनमोल जीवनाची घडी सार्थकी न लावता, आपण आज नाही तर उद्या करू, असे म्हणत प्रत्येक गोष्ट ही त्या निश्चितपणे प्रत्यक्ष कृतीत न उगवणाऱ्या “उद्या करू’वर ढकलत असतो.
वास्तविक उद्या उद्या हे जे आपण म्हणतो तो उद्या तरी आपल्या जीवनात नक्की उगवणार आहे का? हे सुद्धा खरं तर कोणी छाती ठोकपणे सांगू शकत नाही. मग जीवनात ज्या गोष्टी तातडीने वेळीच करायला हव्यात, त्या करायला नको का?
जीवनाची क्षणभंगूरता ओळखून आपण आपल्या संसार प्रपंच्यात जेवढे दक्ष आणि जागरूक राहायला हवे त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने आपण परमार्थात आणि आपल्या नरजन्माची सार्थकता साधून घेण्याच्या कामी सतर्क राहायला हवे. त्यासाठी कलियुगात मानवाचे कल्याण करणारे जे साधे सोपे नामस्मरणाचे साधन आहे. ते आचरणात आणायला काय हरकत आहे? काय अडचण आहे?
आपल्या त्या कृपावंत संतमायबापाचे ऋणी राहायला हवे. कारण त्यांनी तुमच्या आमच्या उद्धारासाठी, शेवटचा दिवस गोड होण्यासाठी, सकल पापांचे क्षालन करणारे आणि सोबत पुण्याची शिदोरी बांधून देणारे भगवंताचे साधे सोपे नाम आपल्याला दिले आहे. ते नाम हेच खरे तर आपल्याला या भवसागरातून तारून नेणारे आहे. पण आपण मात्र ते इतके साधे सोपे साधन जवळ असूनही आज नाही तर उद्या, तरुणपणात नाही तर म्हातारपणात, नाम मी घेईन असे म्हणत असतो आणि इथेच आपली सर्वात मोठी चूक होत असते.
ती चूक होऊ नये म्हणून आपण वेळीच जागे होऊन ईश्वर कृपेने प्राप्त झालेल्या जीवनातल्या प्रत्येक क्षणाचे सोने करून घ्यावे. म्हणूनच तर ना माऊली “हरी मुखे म्हणा। हरी मुखे म्हणा।।’ ही शिकवण देतात. ती संतबोधाची शिकवण लक्षात घेऊन, प्राप्त नरजन्माची सार्थकता साधण्यासाठी आपण साधनेच्या कोणत्या सोपानाने मुक्ती गाठायची हेच तर त्यांच्याकडून शिकायला हवे.