बांगलादेशचा भारताला मित्रत्वाचा संदेश
नवी दिल्ली, दि. 25 – बांगलादेशाबाबत भारताला वाटत असलेला मित्रभाव व आदर पंतप्रधान इंदिरा गांधींनी बांगलादेशचे भारतातील हायकमिशनर शमसूर रहमान यांच्याजवळ व्यक्त केला. आज रहमान यांनी बांगलादेशचे अध्यक्ष अहमद यांचा खास संदेश इंदिरा गांधींना दिला, त्यावेळी इंदिरा गांधींनी वरीलप्रमाणे भारताच्या भावना त्यांना कळविल्या.
बांगलादेशाच्या अध्यक्षांनी आपल्या संदेशात असं म्हटले होते की, बांगलादेश सरकार भारताबरोबरचे सर्व करार मदार पाळील. उभय देश आपली मैत्री कायम ठेवण्यासाठी व शांतता ठेवण्यासाठी झटतील. बांगलादेश स्वतंत्र करण्यात उभय देशांनी स्वार्थत्याग केला आहे.
अनुशासन पर्वात दारूबंदीची नितांत जरूरी
वर्धा – सध्याच्या अनुशासन पर्वाच्या काळात दारूबंदी करणे अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे, असे मत आचार्य विनोबा भावे यांनी व्यक्त केले. गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष श्रीमान नारायण यांना विनोबांनी त्यांचेवरील मत लिहून दाखविले. श्रीमान नारायण हे विनोबांना भेटण्यासाठी पवनार आश्रमात आज गेले होते.
“प्लुटोनियम-238’चे उत्पादन सुरू
मुंबई – “प्लुटोनियम 238′ या मौल्यवान व अतिशय उपयोगी अशा मूलद्रव्याचे उत्पादन येथील भाभा परमाणू संशोधन केंद्रात सुरू झाले आहे, असे न्यूक्लिअर इंडिया या परमाणू ऊर्जा विभागाच्या अधिकृत प्रकाशनात म्हटले आहे.