-डॉ. मेघश्री दळवी
माणूस कुठेही गेला की तो तिथली नैसर्गिक रचना बदलायचा प्रयत्न करतो असं म्हटलं जातं आणि ते खरंही आहे. नद्यांवर धरणं बांधणं, जंगलं तोडून शेती करणं, डोंगरात बोगदे खोदणं हे सदोदित सुरू असतं. यातले काही बदल आवश्यक असले, तरी सर्व वेळी नीट विचार करून पर्यावरणाला कमीत कमी नुकसान पोहोचेल हे पाहिलं जात नाही. एका परीने या घाईघाईत केलेल्या बऱ्यावाईट बदलांचे परिणाम आपण आज भोगतो आहोत आणि म्हणून तंत्रज्ञानाने केलेल्या हानीवर आता तंत्रज्ञानच उपाय देत आहे – जिओइंजिनिअरिंगच्या रूपाने.
तंत्रज्ञानाचा वापर करून काही विशिष्ट हेतूने भूपृष्ठ आणि वातावरण यात विचारपूर्वक चांगले बदल घडवून आणण्याचं शास्त्र म्हणजे जिओइंजिनिअरिंग. आज या शास्त्राला महत्त्व येत चाललं आहे ते ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम कमी करण्यासाठी. त्यातही दोन मुख्य उद्दिष्टं आहेत. एक म्हणजे वातावरणात असलेला कार्बन डायऑक्साइड कमी करणं आणि दुसरे म्हणजे सूर्याकडून येणारी प्रखर विकिरणांना थोड्या प्रमाणात आळा घालणं.
कार्बन डायऑक्साइड आणि जोडीने इतर ग्रीनहाऊस वायू यांचं वातावरणातलं प्रमाण वाढल्याने पृथ्वीचं सरासरी तापमान वाढत आहे. दरवर्षी आपण या वायूंच्या प्रमाणात भरच घालत असतो. पण आता मात्र हे प्रमाण कमी करण्यासाठी संशोधन होत आहे. त्यातील एक उपाय आहे, विशिष्ट प्लॅस्टिक पॉलिमर वापरणारी कृत्रिम झाडं तयार करून वातावरणातला कार्बन डायऑक्साइड शोषून घेणे. याच दृष्टीने कृत्रिम प्रकाशसंश्लेषणाचे प्रयोग सुरू आहेत. त्यात कार्बन डायऑक्साइड घटेल आणि ऑक्सिजन वाढेल असा दुहेरी फायदा होऊ शकतो. महासागरांमध्ये भरपूर प्रमाणात चुना टाकून त्यांची आम्लता कमी केली तर ते वातावरणातला कार्बन डायऑक्साइड जास्त शोषून घेतील असाही एक उपाय शक्य आहे.
कार्बन डायऑक्साइड निर्माण करणारे कार्बन सोर्स, तर तो शोषून घेणारे कार्बन सिंक ही यासाठी एक महत्त्वाची संकल्पना. असे काही नैसर्गिक कार्बन सिंक वाढवणे आणि काही कृत्रिमरीत्या तयार करणे शक्य आहे. कार्बन सिक्वेस्टर करण्यासाठी, म्हणजे वातावरणातला कार्बन वेगळा करून शोषून घेण्यासाठी देखील तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे. सूर्याचे दाहक किरण थोपवणं तसं सोपं नाही. शिवाय आपल्याला प्रकाश आणि सौरऊर्जेसाठी हे किरण आवश्यक असतात. पण महासागरांमधलं क्षारयुक्त पाणी उंचावर फवारलं तर ढगांची घनता वाढून किरणं अडवली जातील असा एक प्रस्ताव त्यासाठी आहे.
वातावरणाच्या उंचातल्या थरात सिलिकेट्स शिंपडून ही विकिरणं कमी करता येतील या संकल्पनेवरही शास्त्रज्ञांचं काम सुरू आहे. सर्व इमारती आणि त्यांची छतं शुभ्र पांढरी करून हे किरण परावर्तित करणे या उपायावरही विचार होतो आहे. काही बेटांवर किंवा विषुववृत्ताच्या आसपासच्या प्रदेशात घरं पांढरी-करडी असतात, त्यामागे हेच कारण असतं.
अवकाशात छत्रीसारखी रचना उभारून तिथूनच प्रखर किरणं अडवणं हा प्रकल्प खर्चिक असला तरी नक्कीच उपयुक्त ठरेल याची शास्त्रज्ञांना खात्री वाटते. या सर्व मार्गांचा जिओइंजिनिअरिंगमध्ये गंभीरपणे विचार होतो आहे. लवकरच त्यांची फळं दिसू दे एवढीच अपेक्षा.