ऑक्टोबर महिना निम्मा संपत आला, तरी देशातील विविध राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अद्यापही पाऊस सुरू आहे. या पावसाचे वर्णन परतीचा पाऊस असे केले जात असले, तरी आजपर्यंतच्या परतीच्या पावसाचा इतिहास पाहता या पावसाला परतीचा पाऊस म्हणायचे का अवकाळी पाऊस म्हणायचे, याबाबत शंका निर्माण होते.
भारतीय अर्थव्यवस्था अजूनही मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून असल्याने आणि भारतीय शेती अजूनही तितक्याच मोठ्या प्रमाणावर पावसावरच अवलंबून असल्याने दरवर्षी शेतकरी जून महिन्यामध्ये पावसाची चातकासारखी वाट बघत असला, तरी सध्या पावसाचा हा अतिरेकीपणा बळीराजाच्या जीवावर उठल्याचे दिसते. कधी नव्हे ते बळीराजा पाऊस जाण्याची वाट पाहात आहे. ज्या कालावधीमध्ये पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे शेतीची उर्वरित कामे करून तयार झालेला शेतमाल बाजारपेठेत पाठवण्याची वेळ आलेली असते त्या कालावधीमध्ये शेतकरी आता शेतातील पाणी कधी बाहेर जाणार आणि त्यानंतर आपण उर्वरित कामे कधी करणार, याची वाट पाहात बसला आहे. पावसाळी हंगामाचे हे बदललेलं समीकरण सर्व स्तरावर गांभीर्याने घेण्याची गरज आहे. एकूणच निसर्गाचं चक्र बदलल्याने आपोआपच पावसाचं चक्रही बदलले आहे, हे गृहीतच आहे. एकेकाळी जेव्हा भूगोल किंवा विज्ञान यासारखे विषय शिकवले जायचे तेव्हा हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा असे तीन ऋतू असून प्रत्येक ऋतू चार-चार महिने चालतो अशा प्रकारची शिकवण विद्यार्थ्यांना दिली जायची. पण गेल्या काही वर्षांपासून हे चार महिन्यांचे गणितही संपूर्णपणे बदलून गेले आहे.
गेल्या पाच ते सहा वर्षांच्या कालावधीमध्ये अपवाद वगळता कधीच पावसाने आपले चार महिन्यांचे गणित राखलेले नाही. हिवाळ्याचा मोसमही दोन महिन्यांच्या वर राहात नाही. मात्र, सर्वसामान्य लोकांचे जीवन अवघड करणारा उन्हाळा मात्र सात ते आठ महिने कमी-अधिक प्रमाणात जाणवतो, ही वास्तव परिस्थिती आहे. अर्थात, या वर्षीचा अपवाद पाहता जुन्या पद्धतीप्रमाणेच जून ते सप्टेंबर या चारही महिन्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. सर्वसाधारणपणे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परतीचा पाऊस येतो आणि नंतर सर्वत्र पावसाची विश्रांती घेतली जाते; पण अद्याप मात्र तसे झालेले दिसत नाही. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे आणखी काही दिवस भारताच्या अनेक राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्येसुद्धा पावसाची हजेरी कायम राहणार आहे. पावसाच्या या बदललेल्या गणितामुळे भारतातील सर्वच घटकांचे आर्थिक गणितही बिघडून गेले आहे. देशात गणेशोत्सवानंतर उत्सवी हंगाम सुरू होत असल्याने सर्वसाधारण व्यापारी ते मोठ्या उत्पादकांनाही हा मोसम सर्वात महत्त्वाचा असतो; पण गणेशोत्सवातसुद्धा पावसाने हजेरी लावली होती आणि काही प्रमाणात अर्थव्यवस्था विस्कळीत केली होती. नवरात्रीतही पाऊस आलाच. आता सर्वसामान्यांना दीपोत्सवाचे वेध लागले असताना त्या दीपोत्सवावर सुद्धा पावसाचे सावट आल्याचे दिसून येत आहे. त्याचा परिणाम म्हणून अजूनही दिवाळीच्या बाजारपेठांमध्ये उत्साह दिसून येत नाही.
भारतामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्रीची उलाढाल कायमस्वरूपी दुकानांमध्ये होती तेवढीच उलाढाल रस्त्यावर बसलेल्या विक्रेत्यांच्या माध्यमातूनसुद्धा होत असते. पण गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये रस्त्यावरील या विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका बसला आहे. दुसरीकडे या सुमारास बळीराजा आपली तयार पिके आणि उत्पादने बाजारात आणत असतो; पण पावसामुळे त्याबाबतही काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. या काळात मोठ्या प्रमाणावर फुलांची आणि फळांची मागणी असते; पण या पावसाने फळपिके आणि फुलांनाही फटका दिल्याने यावर्षी नवरात्रातही अनेक ठिकाणी फुलांची मोठ्या प्रमाणावर टंचाई भासली होती. आणखी एक गोष्ट म्हणजे ऑक्टोबर महिना ते मार्च महिना या कालावधीमध्ये पर्यटनाचा हंगाम मोठ्या प्रमाणावर विकसित झालेला असतो आणि पावसाने विश्रांती घेतल्याने सर्वत्र सुखावणारा हिरवागार निसर्ग असल्याने निसर्ग पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर लोक या कालावधीत बाहेर पडत असतात. पण त्या क्षेत्रालाही या पावसाने फटका दिला आहे.
सातारा जिल्ह्यातील कास पठारावरील पुष्पवैभव पाहण्याचा हंगाम या वर्षी पावसाने पूर्णपणे विस्कळीत करून टाकला आहे. सर्वसाधारणपणे कास पठारावरील फुले सप्टेंबर महिन्याच्या मध्यापासून फुलतात आणि ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत हा हंगाम कायम राहतो. पण ह्या वर्षी या कालावधीमध्ये पावसाने मोठ्या प्रमाणावर हजेरी लावल्याने कास पठारावर अपेक्षित प्रमाणात फुले फुललेली दिसली नाही. महाराष्ट्रातील अनेक पर्यटन स्थळांची सध्याची स्थिती अशीच आहे. पावसाने अनेक ठिकाणचे रस्तेही खराब झाले आहेत. रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी पावसाने जी विश्रांती घेणे गरजेचे असते ती पण मिळत नसल्याने रस्ता दुरुस्तीसुद्धा संकटात आली आहे. ठिकठिकाणी झालेले खड्डे, ठिकठिकाणी साठलेली पाण्याची तळी आणि पावसामुळे विस्कळीत झालेली दळणवळण यंत्रणा यामुळे सर्व स्तरावर सध्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जो पाऊस भारतीय अर्थव्यवस्थेसाठी त्यातही कृषी व्यवस्थेसाठी वरदान मानला जातो तोच पाऊस सध्या संकट ठरत आहे.
कोणत्यातरी किनारपट्टीवर किंवा समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचे कारण सांगून हवामान खाते या पावसाचे समर्थन करत असले तरी या अतिरेकी आणि अवकाळी पावसामुळे सर्व अर्थव्यवस्थाच विस्कळीत झाली आहे. जागतिक स्तरावरील हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे आगामी कालावधीमध्ये सर्वच ऋतू अतिशय तीव्र स्वरूपाचे जाणवणार आहेत. केवळ पावसालाच नाही तरी आगामी कालावधीतील थंडीचा मोसम आणि त्यानंतर येणारा उन्हाचा मौसम यासाठीसुद्धा सर्वसामान्य नागरिकांनी तयार राहायला हवे, असा संदेश या पावसाच्या बदललेल्या समीकरणाने दिला आहे. अर्थात, आता या अतिरेकी पावसाने समाजातील ज्या घटकांना फटका बसला आहे त्यांना या परिस्थितीतून सावरण्यासाठी सरकारी पातळीवर सर्व प्रकारची मदत करण्यास प्राधान्य देण्याची गरज आहे.