संतांचे संगती मनोमार्ग गती । आकळावा श्रीपती येणे पंथे ।। हरिपाठ, अभंग क्र. 8
संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठातील अभंगात म्हणतात, संतसंगतीने मनुष्य सन्मार्गाला लागतो. संतांच्या संगतीत राहून भगवंताला आपलेसे करता येते.
संतसंग धरा तुम्ही हरिभजन करा। पाठी लागलासे काळ दात खातो करकरा ।।
माऊली म्हणतात, प्रत्येकाच्या पाठीमागे काळ लागलेला आहे. या मनुष्यदेहाचा क्षणाचा भरवसा नाही. त्यामुळे संतांची संगत धरा, हरिभजन करा, देवाला आपलेसे करा, असे माऊली सांगताहेत.
जगद्गुरू तुकोबाराय सांगतात, संतसमागमीं धरूनि आवडी । करावी तांतडी परमार्थाची।। संतांच्या संगतीविषयी प्रीती धरून परमार्थ साध्य करून घेण्याची त्वरा करा, असे तुकोबाराय सांगतात. प्रत्यक्ष संतांच्या संगतीत राहिले म्हणजेच परमार्थ घडतो असे नाही. आपण त्यांच्या विचारांच्या संगतीत राहूनही परमार्थ साधू शकतो.