– ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे देहुकर
जयाचें सुखदुःखाचेनि आंगें। झगटलें मानस चेवो नेघे। विषय पासींही आलियां से न रिगे। हें काय म्हणौनि।।63।। इंद्रियें कर्माच्या ठायीं। वाढीनलीं परि कहीं। फळहेतूची चाड नाहीं। अंतःकरणीं।।64।।असतेनि देहें एतुला। जो चेतुचि दिसे निदेला। तोचि योगारूढु भला। वोळखें तूं।।65।।
ज्याचे मन सुख-दुःखाच्या अस्तित्वामुळे कितीही धक्के दिले, तरी पण जागे होत नाही, बहिर्मुख होत नाही अथवा विषय जवळ आले तरी देखील “हे काय आहे?’ म्हणून साधी विचारणा करीत नाही किंवा मनात विषय भोगाची आठवण प्रविष्ट करू देत नाही.
त्याची इंद्रिये कर्म करण्यामुळे वाढली आणि कर्म करण्यातच त्यांचे आयुष्य गेलेले असते, परंतु योगारूढ झाल्यानंतर पुन्हा केव्हाही त्याच्या अंतःकरणात फलाची अपेक्षा उत्पन्न होत नाही.
तो देहधारण करीत असतानासुद्धा वृत्तीशून्य अवस्थेला पोहोचल्यामुळे निजलेला दिसतो; तोच उत्कृष्ट “योगारूढ’ आहे, असे तू ओळख. त्यालाच योग साध्य झाला आहे, असे समजावे.