आपल्या आजूबाजूला असलेल्या मुक्या प्राण्यांबाबत अनेक जण हळहळ व्यक्त करताना दिसतील. मात्र, या मुक्या जीवांसाठी काही तरी करावे असा विचार मोजक्याच लोकांच्या मनात यतो. रजनी शेट्टी यापैकीच एक. जवळपास 20 वर्षांपूर्वी बसने जात असताना तिने एका उपाशी कुत्र्याला खाऊच्या हातगाडीकडे अधाशी नजरेने पाहात असल्याचे पाहिले.
खायला मिळावे यासाठी त्याच्या चाललेल्या तळमळीकडे तिने दुर्लक्ष केले नाही. ती तत्काळ बसमधून खाली उतरली आणि त्या उपाशी कुत्र्याला खायला घातले. त्या दिवसापासून तिने मुक्या जीवांना मदत करण्याचे ठरविले आणि असंख्य मुक्या जीवांची एकप्रकारे सखीच बनली.
विशेष म्हणजे रजनी आपले घर चालवण्यासाठी दुसऱ्यांच्या घरात काम करते. तिच्याकडे जास्त पैसे भलेही नसतील पण या मुक्या जीवांना देण्यासाठी तिचे मन खूप मोठे आहे. ती दररोज एक दोन नव्हे तर तब्बल 800 भटक्या प्राण्यांसाठी खायला बनविते. ती प्रत्येक दिवशी 200 किलो भात आणि चिकन बनविते.
आजवर तिने अनेक मुक्या प्राण्यांचे जीवही वाचविले आहेत. यासाठी प्रसंगी स्वतःचा जीवही धोक्यात घातला आहे. तिने अनेक वेळा विहिरीत पडलेल्या प्राण्यांना स्वतः विहिरीत उतरून बाहेर काढले आहे. तसेच उंच भिंतींवर अडकलेल्या प्राण्यांना वाचवण्यासाठी स्वतः भिंतीवर चढून त्या प्राण्यांचा जीव वाचविला आहे.
गेल्या 20 वर्षांमध्ये तिने अशा प्रकारे एक दोन नव्हे तर तब्बल 200 मुक्या प्राण्यांचा जीव वाचविला आहे. या कामात तिचे पती आणि दोन मुलांचीही मदत होते. तिचा दिवस सकाळी साडेपाच वाजल्यापासून सुरू होतो. या मुक्या प्राण्यांसाठी अन्न बनवून स्कूटरवरून घेऊन जाते तेव्हा तिची मुलगीही तिच्यासोबत असते आणि रस्त्यावरील प्रत्येक मुक्या प्राण्याला ती खाऊ घालते.
एकदा त्यांच्याकडे घराचे भाडे द्यायलाही पैसे नव्हते. अशा स्थितीतही एका कुत्र्याची सुटका करण्यासाठी त्या पुढे सरसावल्या. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर अनेक संस्थांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला.
रजनीला या प्राण्यांचा लळा लागला आहे. हे काम तिला कधीही बंद करायचे नाही. तिचे स्वप्न आहे की, शहरात एक हॉस्पिटल असे असावे, ज्यात भटक्या प्राण्यांवर मोफत उपचार होऊ शकतील. रजनीची कहाणी म्हणजे आजही माणुसकी जिवंत असल्याचे उदाहरण आहे.