शक्तिदेवतेची आराधना करणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. जेव्हा समाजाला गरज भासली तेव्हा तेव्हा अवतार घेऊन कोणत्या ना कोणत्या असुराला संपवण्याचे काम करणाऱ्या या शक्तिदेवतेचा उत्सव आजपासून महाराष्ट्राच्याच नाही, तर देशाच्या कानाकोपऱ्यात उत्साहाने साजरा केला जाईल. सध्या भारताला सतावून सोडणाऱ्या करोना महामारीच्या काळात गेल्यावर्षीचा उत्सव लॉकडाऊनच्या स्थितीत संपन्न करण्यात आला होता.
या वर्षी मात्र नवरात्रीच्या शुभमुहुर्तावर राज्यातील सर्व मंदिरे खुली केली जाणार असल्याने भाविकांमध्ये वेगळा उत्साह संचारला असल्यास नवल नाही. गेल्या काही दिवसांच्या कालावधीत देशातील आणि महाराष्ट्रातील करोनाची परिस्थिती मोठ्या प्रमाणावर सुधारली आहे. दररोज सापडणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी होत आहे आणि बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. याच आठवड्यात राज्यातील शैक्षणिक केंद्रे सुरू झाल्यानंतर आता धार्मिक स्थळेही सुरू होणार आहेत.
वर उल्लेख केल्याप्रमाणे जरी आतापर्यंत शक्तिदेवतेने विविध असुरांचा नाश केला असला, तरी करोनाच्या परिस्थितीत जो असूर निर्माण झाला आहे त्याचा नाश करणे मात्र संपूर्णपणे आपल्याच हातात आहे. शक्तिदेवतेच्या उत्सवामुळे सर्वांना ऊर्जा आणि उत्साह मिळणार आहे, त्याचा वापर करून सर्वांनी समजूतदारपणे वागून जर नियमांचे पालन केले तर आगामी कालावधीत या करोनासुराचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही.
भारतीय पुराणे आणि प्राचीन कथांचा जरी विचार केला तरी जेव्हा जेव्हा शक्तिदेवतेने एखाद्या असुराचा नाश केला तेव्हा तेव्हा तिने लोकांना एकत्र करून या माध्यमातूनच अशा असुरांना संपवले होते. करोनासुराचा अस्त करायचा असेल तर सर्वसामान्य नागरिकांनीच पुढाकार घ्यावा लागणार आहे, असा संदेश आजच्या शक्तिदेवतेच्या उत्सवा निमित्ताने मिळणार आहे.
दीड वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळे बंद असल्याकारणाने भाविकांना थेट आपल्या उपास्य देवतेचे दर्शन होत नव्हते. पण आता सर्व धार्मिक स्थळे खुली होणार असल्याने भाविकांना तो लाभ होणार असला, तरी याची दुसरी बाजूही लक्षात घ्यावी लागणार आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ठिकठिकाणी जी गर्दी होणार आहेत ती महामारीचा प्रभाव वाढवण्यास कारणीभूत ठरू नये, याची दक्षता आता घ्यावीच लागणार आहे.
मंदिरे आणि शैक्षणिक केंद्रे या ठिकाणी करोनाचा प्रसार होण्याची शक्यता अधिक असल्याच्या शक्यतेने गेल्या काही दिवसांपासून ही केंद्रे बंद ठेवण्यात आली होती. पण आता महामारी आटोक्यात आल्याने ही केंद्रे सुरू ठेवण्यात आली आहेत पण त्यामुळेच परत महामारीचा प्रभाव वाढू नये याची दक्षता आपल्याला घ्यावी लागणार आहे. राज्य सरकारने मंदिरे सुरू करण्याबाबत जी नियमावली आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, त्याचा संपूर्णपणे विचार करूनच मंदिर व्यवस्थापकांना आगामी कालावधीमध्ये भाविकांना मंदिरात प्रवेश द्यावा लागणार आहे.
अर्थात, एरव्ही ही सर्वसाधारणपणे अशाच नियमांचे पालन करून मंदिरात भाविकांना प्रवेश दिला जातो. स्वच्छता आणि शिस्त याचे पालन नेहमीच धार्मिक ठिकाणी केले जाते, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मंदिर व्यवस्थापनाने गर्दीवर नियंत्रण कसे ठेवायचे. मंदिर असो किंवा इतर धर्मीयांचे प्रार्थनास्थळे असोत त्या भोवती नेहमीच एक प्रकारची अर्थव्यवस्था तयार झालेली असते.
फुले, पूजा साहित्य, धार्मिक वस्तू, मिठाईची दुकाने धार्मिक स्थळांभोवती एकवटलेली असतात. या ठिकाणच्याही गर्दीवर योग्यप्रकारे नियंत्रण ठेवता येणार आहे काय, याचाही विचार करावा लागेल. शिवाय हे सर्व व्यावसायिक मूलभूत नियमांचे पालन करत आहेत काय, याचीही दक्षता आगामी कालावधीत घ्यावी लागणार आहे. काही प्रमुख मंदिरांमध्ये भाविकांना प्रवेश देताना कोणत्याही प्रकारच्या वस्तू आणण्यास प्रतिबंध केला आहे. म्हणजेच भाविक आता नारळ किंवा इतर तत्सम पूजेच्या वस्तू मंदिरात आणू शकणार नाहीत.
या निर्णयामुळे बऱ्यापैकी परिणाम होणार असला तरी राज्यातील छोट्या-छोट्या मंदिरांमध्ये असा निर्णय अमलात आणणे शक्य आहे काय, याचाही विचार करावा लागणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सर्व धार्मिक स्थळे खुली झाल्यामुळे पर्यटनालाही प्रोत्साहन मिळणार आहे. साहजिकच सार्वजनिक एसटी वाहतूक असो किंवा खासगी बस वाहतूक त्या ठिकाणी ही गर्दी वाढणार आहे. सरकारी बससेवेमध्ये बऱ्यापैकी काळजी घेतली जात असली तरी खासगी बस सुविधा देणारे व्यवस्थापक योग्य काळजी घेऊनच प्रवाशांना आपल्या वाहनांमध्ये प्रवेश देतील का, याचाही विचार यानिमित्ताने करावा लागणार आहे.
दुसऱ्या लाटेचा प्रभाव असताना तिसरी लाट लवकरच येईल अशी चर्चा सुरू झाली होती. सुदैवाने ही लाट अद्याप आलेली नाही, पण आता शैक्षणिक केंद्रे आणि धार्मिक केंद्रे सुरू झाल्यानंतर ही लाट जर आली तर त्याचा दोष शिक्षण केंद्रे आणि धार्मिक केंद्रांना दिला जाणार आहे, हे लक्षात घेऊनच संबंधितांना त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे. परंपरेत सांगण्यात येणाऱ्या कथांप्रमाणे असुरांचा नाश करण्याची जबाबदारी जरी देवांवर देण्यात आली असली तरी आधुनिक काळात मात्र ही जबाबदारी सर्वसामान्य नागरिकांना घ्यावी लागणार आहे.
एखाद्या असुराचा नाश करण्यासाठी जरी विविध शस्त्रांचा आणि अस्त्रांचा वापर करण्यात आला असला तरी करोनाअसुराचा वध करण्यासाठी लसीकरणाचे कवच आणि मास्क, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर या सर्वमान्य त्रिसूत्रीचा वापर लागणार आहे. ही शस्त्रे सामान्य नागरिकांनाच वापरावी लागणार आहेत. शिक्षण केंद्रे आणि धार्मिक केंद्रे आता खुली झाल्याने नागरिकांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत.
समाजातील सर्व व्यवहार नियमित पद्धतीने सुरू झाले आहेत. ही नियमित व्यवस्था आगामी कालावधीमध्येही व्यवस्थित चालू राहावी, असे वाटत असेल तर करोनाअसुराचा कायमचा नायनाट करणे गरजेचे आहे. आजपासून सुरू होणाऱ्या शक्तिदेवतेच्या उत्सवाच्या निमित्ताने समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी या असुराचा नाश करण्यासाठी कटिबद्ध व्हायला हवे.