महाराज कधी कधी अन् तेही मोजक्या जाणकार लोकांच्या समोरच आपल्या मनातली खंत बोलून दाखवीत. ते म्हणत- काय गंमत आहे पाहा, माझ्याकडे येणार्या प्रत्येकाची मागणी ही प्रापंचिकच असते. पण कोणीही मला देव भेेटवा, त्याला आपलासा करण्याची नाम साधना द्या, मला खरा परमार्थ दाखवा, शिकवा, भेटवा असे मात्र मागत नाही. कारण त्यांना हे माहीतच नाही की प्रपंच्यातच परमार्थ आहे.
जो प्रपंच नको म्हणतो त्याला मनातून तो प्रपंच हवाच असतो आणि परमार्थ करणारेही परमार्थाचा प्रपंच हा मांडूनच असतात. वास्तविक प्रपंच काय आणि परमार्थ काय हे वेगळे नाहीतच. माझा आणि स्वार्थाने केला की तो प्रपंच आणि त्याचा अन् नि:स्वार्थ बुद्धीने केला की तोच झाला परमार्थ. पण हे कोणी जाणून घेत नाही. काय हवं आणि काय नको यापेक्षा नेमके काय हवं आणि कसे मिळवावे हे कळायला हवे. असं बघा की जेव्हा आपण एखाद् रुपयाचं नाणं हातात घेतो तेव्हा त्या नाण्याच्या दोन्ही बाजू या आपल्या हातात आपोआप येतातच ना. फक्त पुढची आणि मागची बाजू समजली म्हणजे झालं.
तसं प्रपंच हा खर्या अर्थाने कळला की त्यातच लपून बसलेला परमार्थही कळतो.आपला प्रपंच नीटनेटका होण्यासाठी आपल्याला वित्ताची म्हणजेच पैशा आडक्याची, धनसंपत्तीची गरज असते तसेच आपला परमार्थ हादेखील सार्थ होण्यासाठी तिथेही चित्ताची एकाग्रता, मनाची स्थिरताही आवश्यक असतेच. ती प्रयत्नाने, साधनाने, उपासनेने, चित्ताची एकाग्रतेने मिळवावी लागते.
खरं म्हणजे आपल्याला देवाच्या, गुरूंच्या कृपेने या दोन्ही प्रांतात इतकंच मिळायला हवं असतं की संसारात आपल्याला कोणापुढे लाचारीने हात पसरावा लागू नये. तर परमार्थात आपले मन, चित्त हे इतके त्या ईश नामसाधनेत रमावे की ते आपल्या उपास्य देवतेच्या श्रद्धेपासून, भक्तीपासून, शरणांगत भावापासून आपण कधीही विभक्त होऊ नये. या दोन्ही गोष्टी आपल्याला देते ती सद्गुरू नामाची गुरूकिल्ली.
सद्गुरूंनी दिलेल्या नामाची किल्ली जर आपण कनवटीस लावून घेतली. तर त्या नामाच्या किल्लीने प्रपंच्याचे दार उघडते आणि परमार्थातले भक्तीप्रेमाचे घबाड आपल्या हाती अगदी सहजतेन लागते. पण आधी ती नामाची गुरूकिल्ली मिळायला हवी.