मुंबई – महाराष्ट्रात ईडीने दोन-चार ठिकाणी कारवाया केल्या म्हणून राजकारण तापल्यासारखे वाटत नाही. दिल्लीत ईडीचे हेड क्वॉर्टर आहे. पण पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात भाजप विरोधी सरकार आल्याने ईडीचे हेड क्वॉर्टर महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये आले आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणेवर हल्लाबोल केला. तसेच श्रीधर पाटणकरांवर खोट्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, भाजपला ज्याने सत्तेपासून दूर ठेवले, त्यांना या-ना त्या कारणाने त्रास दिला जात आहे. त्यांच्या कुटुंबाना त्रास दिला जात आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील मंत्री आणि नेत्यांवरती ईडीच्या आणि आयकर विभागाच्या कारवाया सुरू आहेत, असे ते म्हणाले.
तसेच श्रीधर पाटणकरांवर खोट्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली असून त्या कारवाई मागचे सत्य काही तज्ज्ञ मंडळींनी समजून घ्यावे. हे नीट समजून घेऊन चुकीच्या माहितीवर आधारीत काही गोष्टी प्रसारित केल्या जात आहेत. ही आमच्या विरुद्ध बदनामीची मोहीम असून ती उद्या त्यांच्यांवरच उलटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राऊतांनी दिला.
भाजपमध्ये असं कुणीचं नाही का?, आम्ही सर्व पुरावे दिले आहेत. पंतप्रधानांच्या कार्यालयात आणि ईडीकडे आम्ही सर्व पुरावे दिले आहेत. पंतप्रधान कार्यालयातून मला पोचपावती मिळाली आहे. मात्र, आमच्या पुराव्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. केवळ सिलेक्टेड कारवाई सुरू असल्याचे राऊत यांनी सांगितले.