मुंबई – राजकीय वर्तुळात सध्या आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहे. आता पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईत होणार आहे. या बैठकीच्या पूर्वतयारीसाठी मातोश्रीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधत सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. आधी ईडीचं सरकार होतं, आता येड्याचं सरकार आहे, असे नाना पटोले यावेळी म्हणाले आहेत.
येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडी बैठकीची पूर्वतयारी सुरु आहे. यासाठी आम्ही आयोजक असल्याने यासंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी आलो होतो. यावेळी घटकपक्षांना सोबत घेऊन कार्यक्रमाची योग्य तयारी करण्यासंबंधी चर्चा झाली. पूर्ण देशातून सात मुख्यमंत्री आणि व्हीआयपी बैठकीसाठी येणार असल्याची माहिती पटोले यांनी दिली. यावेळी त्यांनी भाजपवर देखील निशाणा साधला.
नाना पटोले म्हणाले की, “‘आता भाजपची उलटी गिनती सुरु झाली आहे. याआधी ईडीचं सरकार होतं आता येड्याचं सरकार झालं आहे. यांच्यात कोणताही समन्वय, काही ताळमेळ नाही. त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसान होत आहे. येड्या सरकारमुळे जनता, शेतकरी, बेरोजगार, तरुण, गरीब त्रस्त आहेत.”
“पवारांनी पंतप्रधानांबद्दल केलेलं विधान खरं आहे. फडणवीस पुन्हा येईन म्हणाले होते. मात्र ते खाली आले. तसेच मोदीही खालच्या पदावर येतीलच. जे भाजपसोबत जातील ते संपतील, असं शरद पवारांना सांगायचं आहे,” असेही नाना पटोले यांनी स्पष्ट सांगितले.