Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो न्याय यात्रे’दरम्यान अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणाच्या मुद्दयावरून टीका केली आहे. चित्रपट कलाकार ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन या कार्यक्रमाला उपस्थित होते, पण दलित, आदिवासी आणि राष्ट्रपतींना देखील निमंत्रित करण्यात आले नव्हते, हा त्यांचा अवमान असल्याचे राहुल यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमाला देशातील हजारो प्रतिष्ठित उद्योजक, चित्रपट, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर वैयक्तिकरित्या उपस्थित होते.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज भेटीदरम्यान ते म्हणाले, “तुम्ही राम मंदिरातील अभिषेक सोहळा पाहिला का? तिथे एकही ओबीसी चेहरा होता का? अमिताभ बच्चन ,ऐश्वर्या राय होते आणि नरेंद्र मोदी होते. देशाच्या लोकसंख्येच्या 73 टक्के लोक या कार्यक्रमादरम्यान कुठेही दिसले नाहीत. त्यांनी देशाची धुरा सांभाळावी असे भाजपला कधीच वाटणार नाही.”
पुढे ते म्हणाले, “दलित, मागास आणि आदिवासी यांच्याकडे दुर्लक्ष केले असून त्यांच्याऐवजी उद्योगपतींना प्राधान्य दिले जात आहे. पंतप्रधान मोदी हे शेतकऱ्यांचे खिसे कापून केवळ उद्योगपतींचे खिसे भरत आहे. धर्माच्या नावाखाली देशात द्वेषच पसरविला जात आहे.”
राहुल गांधींविरोधात घोषणाबाजी
राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा सोमवारी (19 फेब्रुवारी) दुपारी 3 वाजता अमेठीत दाखल झाली होती. अमेठीतील गांधी चौकात पोहोचताच भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शने करत ‘राहुल गो बॅक’च्या घोषणा दिल्या. ‘जय श्री राम’चा झेंडा घेऊन दाखल झालेल्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींविरोधात घोषणाबाजी केली.
मात्र, पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना चौकापासून 30 मीटर अंतरावर रोखले. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींच्या दौऱ्याचा खरपूस समाचार घेतला आहे. राहुल गांधींच्या दौऱ्यात काँग्रेस कार्यकर्तेही सहभागी झाले नाहीत, असे ते म्हणाले. रिकाम्या रस्त्यांनी त्यांचे स्वागत केले. अमेठीतील राहुल यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले नसल्याचा दावा करून स्मृती इराणी म्हणाल्या की ज्याला स्वत:च्या पाठिंब्याची गरज आहे तो दुसऱ्यांचा आधार कसा बनू शकतो. चार दिवसांच्या दौऱ्यासाठी स्मृती अमेठीत पोहोचल्या आहेत.