आयुक्त हर्डीकर यांच्या बदलीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पिंपरी (प्रतिनिधी) – पवना धरण पूर्ण क्षमतेने भरले असतानाही केवळ नियोजनाचा अभाव, ढिसाळ आणि अकार्यक्षम कारभारामुळे शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाचा खेळखंडोबा झाला आहे. दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय हा जनतेच्या विरोधात आहे. हा निर्णय त्वरीत मागे घेण्याचे आदेश द्यावेत. तसेच, आयुक्त श्रावण हर्डीकर यांची बदली करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
आयुक्त हर्डीकर यांनी सोमवारपासून (दि. 25) दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व महापालिका प्रशासन यांच्या अकार्यक्षम, गलथान कारभारामुळे असा निर्णय घ्यावा लागला आहे. त्याचा शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास शहरातील करदात्या नागरिकांना होत आहे. विशेषत: महिलांना या निर्णयाचा खूप त्रास सहन करावा लागत आहे. यंदा पावसाळा चांगला झालेला आहे.
परतीचा पाऊस देखील मोठा झालेला आहे. तरीही केवळ नियोजनाचा अभाव, ढिसाळ, अकार्यक्षम कारभारामुळे हा दुर्दैवी निर्णय घ्यावा लागला आहे. महापालिकेतील विविध प्रकल्पाच्या निविदा, ठेके, त्यातील रिंग, सल्लागारांच्या नियुक्त्या, थेट पद्धतीची कामे, त्यातून टक्केवारीचे राजकारण यामध्ये सत्ताधारी भाजपा व प्रशासन मश्गुल आहे. त्यांना पाणी, आरोग्य, स्वच्छता या मूलभूत प्रश्नांवर काम करण्यासाठी वेळच नाही.
सत्ताधारी व प्रशासन केवळ पैसा कमावणे याच कु-उद्देशाने काम करीत आहेत. शहरातील नागरिकांच्या जीविताशी खेळत आहे. त्यामुळे अशा अकार्यक्षम, संवेदनाहीन सत्ताधारी भाजपा व महापालिका प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करीत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी पत्रात म्हटले आहे.