काऱ्हाटी -सुपे-काऱ्हाटी (ता. बारामती) परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाची संततधार कायम असल्याने पिकांमध्ये पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे मुगास पिकाला मोठा फटका बसला आहे. पावसामुळे मुगाच्या शेगांना कोंब फुटले असल्याने मूग शेतीची माती होते काय, अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे.
सुपे-काऱ्हाटी परिसरातील शेतकरी बाजरी, कांदा, सूर्यफूल, मका, तूर, उडीद, भुईमूगासह मुगाच्या पिकालाही पेरणीसाठी प्राधान्य देतात. यंदा खरिपाची सुगी साधली होती. तर खते, किटकनाशकांची फवारणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यामुळे पीक वाऱ्यावर डोलत असल्याने यंदा चांगले उत्पन्न निघणार अशी शेतकऱ्यांना आशा होती.
मात्र, गेल्या आठ ते दहा दिवसांपासून या परिसरात सूर्यदर्शन झालेले नसून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांमध्ये पाणी साचले असून ते सडण्याच्या मार्गावर आहे. शेंगा पिवळ्या होऊन खाली पडत असून कोंब आल्याने शेतकरीराजा चिंतेत पडला आहे. त्यामुळे यंदाचाही हंगाम वाया जातो की काय अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण
झाली आहे.