पुसेगाव (प्रतिनिधी) – खरीप हंगामात सोयाबीन हे खटाव तालुक्यातील महत्त्वाचे पीक आहे. उच्च तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सोयाबीनच्या उत्पादनात हमखास वाढ होईल, असे प्रतिपादन हरिदास भोसले यांनी केले.
कृषी विभागाच्यावतीने पुसेगाव मंडळांतर्गत रुंद वरंबा पद्धतीने 150 हेक्टरवर सोयाबीन लागवड प्रकल्प मंडलाधिकारी सचिन लोंढे यांच्या मार्गदर्शनखाली राबविण्यात आला आहे. त्यासंदर्भात हरिदास भोसले म्हणाले, या पद्धतीने झालेल्या पेरण्यांमुळे बियाणे व खतांची बचत होते.
दोन वाफ्यांमध्ये अंतर ठेवल्याने तण नियंत्रण व औषध फवारणी सुलभ पद्धतीने करता येते. सरींमध्ये आंतरपिके घेता येतात. या पद्धतीमुळे पाच-सहा क्विंटलपर्यंत ज्यादा उत्पन्न मिळते. पुसेगाव येथील इंदुमती भोसले यांच्या शेतात बीबीएफद्वारे केलेल्या सोयाबीनच्या प्लॉटची पाहणी करून कृषी पर्यवेक्षक मुकुंद म्हेत्रे यांनी समाधान व्यक्त केले.