पुणे – महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा नियोजनशून्य कारभार पुन्हा समोर आला आहे. गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला. दरम्यान, भामा-आसखेड योजनेच्या 1,700 मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीला गळती लागली. हे काम शनिवारी पहाटे संपले. त्यामुळे गुरुवार आणि शुक्रवार आणि शनिवारी देखील येरवडा, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, खराडी, वडगावशेरीचा काही भाग तसेच नगररस्ता परिसरातील तब्बल 8 ते 10 लाख पुणेकरांना पाण्याविना काढावे लागले.
सलग दोन दिवस पाणी बंद असल्याने अनेकांना खासगी टॅंकरच्या लुटमारीचा सामना करावा लागला. शिवाय पिण्याच्या पाण्यासाठी बाटल्या विकत घेण्याची वेळ आली. गुरुवारच्या पाणी बंदनंतर जलवाहिनीतील गळतीमुळे शुक्रवारी पाणी बंद राहणार होते. तसेच शनिवारी उशिरा पाणी येणार असल्याचेही पालिकेने नागरिकांना कळवले नाही. तर, नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत मनस्तापात भर घालण्यात आली. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी अक्षरश: भटकावे लागले. अनेकांनी शहराच्या इतर भागांतून रिक्षाने आणि खासगी वाहनांनी पाणी आणले.
तर काहींनी अर्धा ते एक किलोमीटर दुसरीकडे जात बोअरवेल, तसेच ज्यांच्याकडे पर्यायी सुविधेमुळे पाणी आले त्यांच्याकडे धाव घेतली. महापालिकेने दोन वर्षांपूर्वी ही योजना शहराच्या पूर्व भागासाठी सुरू केली असून, भामा-आसखेड धरणातून दररोज सुमारे 160 ते 170 एमएलडी पाणी उचलण्यात येते. मात्र, योजनेच्या मुख्य जलवाहिनीला वारंवार गळती लागत असून जलवाहिन्या जोडलेल्या ठिकाणी वारंवार गळती होत आहे. त्यामुळे जलवाहिनीच्या कामावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या प्रकल्पासाठी अत्याधुनिक “सेन्सर’ उपकरणे वापरण्यात आली आहेत. त्यामुळे पाणीगळती, कमी दाबाने पाणी येणे तसेच जलवाहीनीबाबत काही समस्या असल्यास तत्काळ यंत्रणांना “अलर्ट’ मिळतो. त्यामुळे महापालिकेनेही पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्यास त्याची कल्पना नागरिकांना देणे अपेक्षित आहे. मात्र, त्याकडे सोयीस्कर दुलर्क्ष केले जात असून दोन दिवस शहराच्या एखाद्या भागात पाणीच नसताना महापालिका ही बाब लपवून नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप होत आहे.
पाणीपुरवठा बंद का झाला?
भामा-आसखेड धरणाच्या जवळच करंजविहिरे गावात 1,700 मिमी व्यासाच्या जलवाहिनीच्या जॉइंटमध्ये गळती सुरू झाली. त्यामुळे महापालिकेने शुक्रवारी सकाळी तातडीने हे काम हाती घेतले. मात्र, तेथून जवळच काही अंतरावर आणखी एक गळती आढळून आली. या दोन्ही गळती बंद करण्यासाठी महापालिकेस शनिवारी पहाटे पाच वाजेपर्यंत काम केले. त्यामुळे गुरूवार, शुक्रवार आणि शनिवारी पहाटेही या योजनेवर अवलंबून असलेल्या भागात पाणीच आले नाही. तर लष्कर भागातून काही भागात पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही.