पुणे – डॉ. श्रीराम लागू यांनी केवळ नाटक उभे केले नाही तर, मराठी रंगभूमी हिमालयाच्या उंचीवर नेऊन ठेवली. मराठी कलाकारांना त्यांचा कायम आधार होता. त्यांच्या निधनामुळे मराठी रंगभूमी पोरकी झाल्याची भावना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली.
डॉ. श्रीराम लागू यांनी मराठी रंगभूमीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक कलाकार रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत उदयाला आले आणि ही प्रेरणा सातत्याने नवीन पिढीला मिळत राहणार आहे. त्यांच्या वैचारिक भूमिका आणि रंगभूमीवर साकारलेल्या वेगवेगळ्या भूमिका रसिकांना विसरता येणार नाही.
– सुभाष देसाई, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री
माझ्या अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनीच मार्गदर्शन केले. मी स्वत:ला भाग्यवान समजते की मला त्यांच्यासारखा महान गुरू लाभला.
– उर्मिला मातोंडकर, अभिनेत्री
डॉ. श्रीराम लागू यांच्यामुळे अनेक कलाकार आणि दिग्दर्शक चित्रपट व नाट्यसृष्टीत तयार झाले असून त्यापैकी मी एक आहे. त्यांनी नाटक आणि चित्रपटांप्रमाणेच समाजालाही एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला.
– डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ दिग्दर्शक
डॉ. श्रीराम लागू हे नट म्हणून जितके श्रेष्ठ होते तितकेच माणूस म्हणूनही महान होते. गरिबांकरिता त्यांच्या मनामध्ये असलेली माया त्यांनी कधीही कमी होऊ दिली नाही. हे एका महान कलाकाराचेच लक्षण आहे.
– डॉ. अमोल पालेकर, ज्येष्ठ अभिनेते
रंगभूमी आणि चित्रपटातील डॉ. लागू यांचे काम अतुलनीय आहे. त्यांनी हमाल, माथाडी, सर्वसामान्य मजूर यांच्यासाठी आर्थिक आणि सामाजिक दृष्टीकोनातून केलेली मदत त्याहून मोठी आहे. त्यांच्यासारखा कलाकार पुन्हा होणार नाही.
– डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ कामगार नेते
चित्रपट आणि नाटक या दोन्हीमध्ये डॉ. लागू यांनी आपली हुकमत गाजविली. प्रसिद्धीच्या शिखरावर असूनही सर्वसामान्य कलाकारांना न्याय देण्यासाठी कायम पुढाकार घेतला होता.
– मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
भूमिका करणारा आणि अन्यायाविरोधात भूमिका घेणारा कलाकार आपल्यातून निघून गेला आहे. त्यामुळे, रंगभूमी आणि समाजच एकप्रकारे पोरका झाला आहे.
– प्रा. रामदास फुटाणे
डॉ. श्रीराम लागू जितके महान होते तितकेच ते नम्र असलेले कलाकार होते. सर्वसामान्यांचे दु:ख पाहून त्यांच्यातील कलाकार कायम अस्वस्थ होत होता.
– सुधीर गाडगीळ, ज्येष्ठ मुलाखतकार
अंतिम प्रवासावेळी “तिसरी घंटा’
डॉ. लागू यांचे पार्थिव बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात दर्शनासाठी ठेवले होते. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर पार्थिव वैकुंठाच्या दिशेने शववाहिनीतून नेण्यात आले. रंगभूमीवर तिसरी घंटा वाजविल्यानंतर नाटकाचा पडदा उघडण्याची प्रथा आहे. त्याप्रमाणे, शववाहिनीसमोर नागरिकांनी हातात घंटा घेऊन नाद केल्यानंतर डॉ. लागू यांचे पार्थिव वैकुंठाच्या दिशेने नेले. यावेळी काही क्षणासाठी उपस्थित असणारे सर्वजण स्तब्ध झाल्याचे पाहावयास मिळाले.
ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर शुक्रवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नाट्य, सिनेमा, साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रांतील मान्यवरांसह डॉ. लागू यांच्या चाहत्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.