नगरसेवकांचा प्रश्न : दापोडी दुर्घटना, डेंग्यूने बालकांच्या मृत्यूने प्रशासन धारेवर
पिंपरी – दापोडी दुर्घटनेमध्ये जवान विशाल जाधव व मजूर नागेश जमादार यांना प्राण गमावावे लागले. डेंग्यूने एकाच घरातील दोन लहान बालकांचा मृत्यू झाला. गेल्या महिन्याभरात शहरामध्ये मृत्यूचे तांडव सुरू आहे. असे असताना महापालिका प्रशासन झोपेत आहे का? असा सवाल महासभेत नगरसेवकांनी केला. महापालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी पार पडली. महापौर माई ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. श्रद्धांजली कार्यक्रम घेवून महासभा तहकूब करण्यात आली.
दापोडी दुर्घटना व थेरगाव येथे एकाच घरातील दोन भावंडाचा डेंग्यूने मृत्यू झाल्यामुळे नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. नगरसेवक दत्ता साने म्हणाले, दापोडी दुर्घटनेमध्ये अजूनही प्रशासनाने उत्तरे दिली नाही. निष्पाप लोकांचे जीव जातात याला कारणीभूत कोण आहे याचा शोध लागला पाहिजे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आज दोन्ही कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेच्या ढिसाळ प्रशासनामुळे त्यांच्या कुटुंबावर ही वेळ आली आहे. त्यासाठी महापालिकेने त्यांना आर्थिक मदत करावी. एकाच घरातील दोन बालकांचा डेंग्यूने मृत्यू झाला. आज आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
आशा शेंडगे म्हणाल्या, दापोडी येथील खोदकामासाठी ठेकेदाराला 209 मीटर लाइन टाकण्याचे काम दिले आहे. या कामासाठी दोन वर्ष मुदत देण्यात आली आहे. मात्र आता 20 महिने होत आले ठेकेदारांने फक्त 61 मीटर केबल टाकण्याचे काम केले. म्हणजे किती प्रशासन ठेकेदारांना पाठीशी घालत आहे. या दुर्घटनेमध्ये प्रशासनाचा निष्काळजीपणा भोवला आहे. ठेकेदाराला माहीत होते की त्याठिकाणची परिस्थिती कशी आहे तर त्यांने काळजी घेणे अपेक्षित होते. चिकट स्वरुपाची माती आहे हे माहीत असतानाही ठेकेदारांने त्याठिकाणी जाळी का लावली नाही. ठेकेदार कुठल्याही प्रकारची काळजी घेत नाही मग त्यांना आपण ठेका का देतो, याची उत्तरे प्रशासनाने द्यावी. डेंग्यूने शहरामध्ये थैमान घातले आहे.
शहरातील रस्त्याची अवस्था दयनीय आहे, असे असताना प्रशासन काहीच ठोस पाऊले का उचलत नाही. शहरातील दुर्घटनेवर दोनच नगरसेवकांना बोलण्याची संधी दिली. त्यानंतर श्रद्धांजली वाहून महासभा 6 जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली. त्यामुळे या विषयावर काहीच निर्णय झाला नाही.
आयुक्तच सुरक्षित नाही
शहरात रोगराई इतकी वाढली आहे, की आयुक्तही सुरक्षित नाही. त्यांना चिकणगुणियाची लागण झाली होती. आयुक्तच सुरक्षित नसतील तर शहरातील नागरिकांचे काय असा प्रश्न नगरसेवक दत्ता साने यांनी उपस्थित केला.