पुणे – पुण्यातील नामवंत खासगी रुग्णालयात भूलतज्ज्ञ असलेला डॉ. अदनान अली सरकार हा “इसिस’च्या महाराष्ट्र गटाचा (मॉड्युल) म्होरक्या असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. डॉक्टर ते “इसिस’चा म्होरक्या असलेल्या सरकार याचा गुन्हेगारीचा आलेख चढता असून, “इसिस’ संबंधित देशभरात आतापर्यंत अटक केलेल्यांचा त्याच्याशी कसा संबंध आला आहे, याचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सुरू केला आहे. तरुणांची माथी भडकवून त्यांना “इसिस’मध्ये भरती करत असल्याचेही तपासात निदर्शनास आले आहे. दरम्यान डॉ. सरकारची एटीएसने 2016 आणि 2017 मध्ये दोनदा चौकशी केल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, तेव्हा त्याला अटक करण्याइतके पुरावे एटीएसच्या हाती लागले नव्हते.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने गुरुवारी डॉ. सरकार याच्या कोंढव्यातील घरावर छापा टाकून त्याला अटक केली. त्याच्या घरातून लॅपटॉप, हार्ड डिस्क, सिमकार्ड, तसेच “इसिस’शी संबंधित काही कागदपत्रे जप्त केली आहेत. डॉ. सरकार तरुणांची माथी भडकावून “इसिस’मध्ये भरती करत असल्याची माहिती प्राथमिक तपासात निष्पन्न झाली आहे.
डॉ. अदनान अली हडपसर भागातील एका नामवंत रुग्णालयात भूलतज्ज्ञ आहे. पंधरा वर्षांपासून तो वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून, त्याने पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयातून अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. “इसिस’च्या दहशतवादी विचारधारेच्या प्रसाराचे काम तो करत होता. तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये ओढत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, डॉ. सरकारला मुंबईतील विशेष न्यायालयात “एनआयए’च्या पथकाने शुक्रवारी हजर केले. विशेष न्यायालयाने त्याला दि. 8 ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
2017 मध्येच तयार होती कुंडली
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “इसिस’च्या दहशतवादी कारवायांमध्ये तरुणांना ओढण्यात महाराष्ट्रातील गट सक्रिय होता. याबाबतची माहिती “एनआयए’ला मिळाल्यानंतर मुंबई, ठाणे, पुणे येथे कारवाई केली. “एनआयए’च्या पथकाने चौघांना अटक केली होती. मुंबईतून तबिश नासेर सिद्दीकी, पुण्यातील जुबेर नूर मोहंमद शेख, अबू नुसैबा आणि ठाण्यातील शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला यांना अटक करण्यात आली होती.
“एनआयए’ कोठडीत त्यांची चौकशी करण्यात आली. तेव्हा डॉ. अदनानअली सरकार “इसिस’च्या दहशतवादी विचारधारेच्या प्रसारात सामील असल्याची माहिती मिळाली. त्याच्या हालचालींचा प्रथम संशय 2016 मध्ये एटीएसच्या पुण्यातील कार्यालयाला आला होता. तेव्हा त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्याची काही तास कसून चौकशी करण्यास आली होती. मात्र, डॉ. सरकारने ठोस असे कोणतेही पुरावे मागे सोडले नव्हते. त्यामुळे त्याला चौकशी करून सोडण्यात आले.
तर पुन्हा एकदा त्याला 2017 मध्ये चौकशीसाठी बोलावण्यात आले. तेव्हाही त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्याची कुंडली जवळपास तयार करण्यात आली होती. मात्र, चौकशीचे रूपांतर अटकेत होऊ शकले नाही. यानंतर डॉ. सरकार सावध होऊन शांत बसला असेल, असे एटीएसला वाटले होते. “एनआयए’च्या कारवाईनंतर मात्र हा भ्रम दूर झाला आहे.