नवी दिल्ली – राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या राज्यांत कॉंग्रेसचा पराभव झाल्यानंतर आता इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडीचे नेतेही कॉंग्रेसच्या पराभवाबद्दल प्रश्न उपस्थित करत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात पराभव झाल्यानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी या राज्याल रामराम करत ते केरळमध्ये सक्रिय झाले.
त्यांनी दक्षिण भारताकडे कुच केल्यामुळे उत्तर भारतातील कॉंग्रेसची पकड सैल होत चालली असल्याचे इंडियाच्या नेत्यांचे म्हणणे असून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते एम. व्ही. गोविंदन यांनी तर राहुल यांच्या वायनाड येथून निवडणूक लढण्याच्या निर्णयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. केरळमध्ये भारतीय जनता पार्टीचे अस्तित्वच नाही. राहुल यांनी भाजपच्या विरोधात लढायला हवे, डाव्या आघाडीच्या विरोधात नाही असे गोविंदन यांनी म्हटले आहे.
कॉमन सेन्स असणारी कोणीही व्यक्ती हेच सांगेल की राहुल गांधी यांनी आगामी निवडणूक वायनाड येथून लढू नये. त्यांनी तसे केले तर हिंदी पट्ट्यात कॉंग्रेसची पकड आणखी सैल होईल. राहुल वायनाडमधून लढले तर हाच संदेश जाईल की ते भाजपच्या विरोधात नाही तर डाव्या आघाडीच्या विरोधात लढत आहेत असेही गोविंदन यांनी म्हटले आहे.
गोविंदन म्हणाले की केरळमध्ये मुस्लिम लीगचा कॉंग्रेसला पाठिंबा आहे. त्यांच्या पाठिंब्याशिवाय कॉंग्रेस पक्ष काहीच करू शकला नसता. कॉंग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये विजय मिळू शकत नाही त्यामुळेच ते केरळमध्ये आले आहेत. त्यातून हेच स्पष्ट होते की हिंदी भाषिक राज्यांत आता कॉंग्रेसचा तेवढा प्रभाव राहीलेला नाही.