- समाजातील दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन
चऱ्होली – दिघी परिसरातील विनायक पार्क येथे समाजातील अतिवंचित, स्थलांतरित, आत्महत्याग्रस्त शेतकरी, आदिवासी कुटुंबातील मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण व पुनर्वसन करण्यासाठी स्नेहछाया सामाजिक प्रकल्प काम करीत आहे. मात्र, काही कारणांमुळे सद्यःस्थितीतील जागा खाली करण्याची वेळ आल्याने मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. करोना व काही दिवसांवर येऊन ठेपलेला पावसाळा या दुहेरी संकटात कुणी घर देता का घर अशी आर्त हाक मुलांनी समाजाला घातली आहे.
समाजसेवक बाबा आमटे यांच्या विचार व कार्याने प्रेरित होऊन 2 मे 2019 रोजी समाजसेविका साधनाताई आमटे यांच्या जयंतीदिनी प्रा. दत्तात्रय इंगळे व माई सारिका इंगळे या दाम्पत्यांनी जीवन विद्या परिवर्तन ट्रस्टद्वारा लोकसहभागातून स्नेहछाया सामाजिक प्रकल्पाची सुरुवात केली. या वेळी दिघीतील उद्योजक कैलास बोरसे यांनी सामाजिक बांधिलकी जपत विनाभाडेतत्त्वावर विनायक पार्क येथील जागा प्रकल्पाकरिता दिली होती. त्यामुळे तात्पुरते का होईना गेल्या दोन वर्षांपासून मुलांच्या राहण्याचा प्रश्न सुटला होता. मात्र येत्या दीड-दोन महिन्यांत सदर जागेवर बांधकाम करायचे असल्याची पूर्वसूचना दिल्याने या जागेतून स्थलांतरित होणे गरजेचे झाले आहे. पिंपरी-चिंचवड सारख्या शहरात दोन वर्ष तीन हजार स्क्वेअर फूट जागा एक पैसाही मोबदला न घेता सामाजिक प्रकल्पासाठी देणे ही बाब खरोखरच आमच्यासाठी खूप अनमोल आणि आधाराची असल्याची भावना प्रकल्पाचे संचालक प्रा. इंगळे यांनी व्यक्त केली.
सद्यःस्थिती बघता वाढता करोनाकाळ आणि जवळ आलेला पावसाळा अशा बिकट परिस्थितीत निवारा मागण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. आज अशा संकट काळामध्ये रोजच्या जेवणाचे, जीवनाचे प्रश्न सोडविण्यासाठी कसरत करावी लागत असतानाच भर पावसाळ्यात दुसऱ्या ठिकाणी निवारा उभा करणे, अथवा भाड्याने घेणे या सगळ्या गोष्टी सध्यातरी आवाक्याच्या बाहेर असून, आज खरोखरच समाजातील दातृत्वाची व मदतीची खरी गरज या मुलांना आहे.
टाळेबंदी व पावसाळ्यात आता जागा कुठे मिळेल? कशी मिळेल? तिथून पुढे मुलांच्या शाळेची काय व्यवस्था असेल? या सर्व प्रश्नांचे थैमान घालत असताना या संकटसमयी प्रकल्पातील मुलांच्या मदतीसाठी मार्गदर्शन, मदत आणि साथ द्यावी. शहरातील माझ्या सुहृदयी बांधवांनी प्रकल्पातील मुलांसाठी दिघी, पिंपरी-चिंचवडमध्ये कुठेतरी तरी निवारा देऊन सहकार्य करावे, अशी भावनिक साद प्रकल्पाच्या व मुलांच्या माई सारिका इंगळे यांनी घातली आहे.
स्नेहछाया सामाजिक प्रकल्पाचे रोपटे दोन वर्षांपूर्वी लावले आहे. ते आता कुठेतरी वाढत आहे, थोडाफार आकार घेत आहे. स्थलांतर करण्याची ही वेळ सदर कार्यावर परिणाम करणारी आहे. तरी समस्या लक्षात घेऊन आम्हाला जमेल तसे सहकार्य करावे.
– प्रा.दत्तात्रय इंगळे, स्नेहछाया प्रकल्प