पचनसंस्थेच्या संदर्भात आहाराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पचनाचे बरेच विकार अयोग्य खाण्याने, अवेळी खाण्याने, चुकीच्या पद्धतीने तयार केलेले अन्न खाण्याने व आहाराच्या घटकांच्या अपायकारक एकत्र येण्याने होत असतात. आपल्या आहाराचे काळजीपूर्वक निरीक्षण आणि आहारशास्त्राच्या ज्ञानावर आधारलेले विश्लेषण प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. पचनाच्या तक्रारी असणाऱ्या व्यक्तींमध्ये हा विषय फारच महत्त्वाचा असतो.
अन्नाला योग्य चव नसेल, तर लाळ निर्माण होणार नाही. लाळ अन्नात मिसळणे महत्त्वाचे असते. पुरेशी लाळ तयार न झाल्यास तोंड कोरडे पडते. अन्न गिळण्यास त्रास होतो. जिभेवर व तोंडाच्या आत लहान लहान जखमा होऊ लागतात. लाळेत असणारी प्रतिपिंडे उपलब्ध न झाल्याने तोंडात फोड येणे, हिरड्या सुजणे, घशात व तोंडात बुरशी वाढणे, असे प्रकार होतात. तोंड का कोरडे पडते आहे, याचा शोध घ्यावा लागतो. अनेक औषधांचा व कॅन्सरसारख्या विकारासाठी केलेल्या उपचारांचा हा एक त्रासदायक परिणाम असतो. शिवाय मानसिक स्थितीचे फार महत्व असते. त्यामुळे थोडे थोडे पाणी पिणे हाच तक्रार निवारण्याचा उपाय असतो. जिभेला, गळ्याला, हिरड्यांना ग्लिसरीन लावण्याने तात्पुरता फायदा होईल. कारण शोधणे व ते दूर करणे महत्त्वाचे. अन्न चवदार असावे; पण फार चमचमीत खाणे अयोग्य ठरते. असे अन्न अनेक वेळा वाजवीपेक्षा जास्त खाण्यात येते. यातून अनावश्यक मेदवृद्धी होते. मधुमेह, वाढलेला रक्तदाब, गुडघ्यांचा ऑस्टिओआर्थ्रायटिस प्रकारचा संधिवात, पित्ताशयाचे विकार, छाती व पोट यातील पडद्यातून जठराचा भाग छातीत जाण्याने होणारा हायाटस हर्निया, मेदवृद्धिबरोबर आलेल्या रक्तघटकांतील बदलामुळे होणारे रक्तवाहिन्यांचे कठिण विकार व हृदयविकाराचा, पक्षाघाताचा धोका या साऱ्यांचे मूळ अनावश्यक उष्मांक घेण्यात आहे. शिवाय तिखट, आंबट, खारवलेले, तळलेले पदार्थ, चहा, कॉफी, तंबाखू, मद्यपान यांच्या अतिरेकामुळे जठराच्या अस्तराला दाह होतो. त्यातून अन्नरसाबरोबर आम्ल होण्याचे प्रमाण वाढते.
भूक न लागणे किंवा खा खा सुटणे, पोट दुखणे, गॅसेस होणे, अपचन होणे, ढेकर येणे, शौचास साफ न होणे, मलावरोध, जुलाब, आव, शेम किंवा शौचावाटे रक्त पडणे अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात आढळतात. या साऱ्यांचा संबंध पचनसंस्थेशी आहे. पचनसंस्था म्हणजे मूलत: जठर, लहान आतडे व मोठे आतडे या तीन अवयवांची बनलेली असली तरी तोंडातल्या लाळ तयार करणाऱ्या ग्रंथी, घसा व अन्ननलिका, यकृत, स्वादुपिंड यांचाही समावेश या संस्थेतच होतो. शिवाय या संस्थेचे काम सुरळीत व्हावे, यासाठी मज्जासंस्था व अंतग्रंथी यांचाही विचार पचनसंस्थेत घडत असणाऱ्या घटकांबाबत करावा लागतो.
भूक लागल्यापासून मलविसर्जन होण्यापर्यंत अनेक कार्यांवर चिंता, मरगळ, अपेक्षाभंग, भीती, राग, नैराश्य, उन्माद इत्यादींचे परिणाम होत असतात. कोणत्याही तक्रारीमागचे शरीरचनात्मक शरीक्रियात्मक, पेशींच्या व उतींच्या रचनेतील विकृती आणि त्याची कारणे अशा चतुष्ट्याचे मिळून एक परिपूर्ण निदान होते. त्यावरच उपचार ठरतो. कोणत्याही उपचारात विकार झालेल्या अवयवाला पूर्ण विश्रांती, योग्य आहार, तक्रारींचे शमन होण्याकरिता केलेले उपाय आणि शेवटी आजार पूर्ण बरा होण्याकरिता केलेले उपचार अशा चार पद्धतींचा वापर आवश्यक असतो. आहारशास्त्र हे खूप मोठे शास्त्र आहे. शरीराच्या बदलत्या स्थितीत शरीराला योग्यरीत्या कार्यक्षम राहता यावे, यासाठीही आहाराचा विचार करावा लागतो.
विविध प्रकारच्या आहारामुळे अनेक आजार उद्भवतात. छातीत आणि पोटात आग व जळजळ होणे, मळमळ, उलटी अशा तक्रारींसाठी वाढलेले आम्ल हेच कारण आहे. त्यासाठी थोडे खावे, वारंवार खावे, साधे जेवण घ्यावे. चपाती, भात, भाकरी, उकडलेल्या-फोडणी दिलेल्या भाज्या, गोड दही, ताक, उकडलेले बीट, शिजवलेले गाजर, अधिक पिकलेली गोड फळे (केळे, पपई, सफरचंद) खावीत. तंबाखू व मद्यसेवन कटाक्षाने टाळावे. चहा फिका घ्यावा. फार कढत किंवा कडक चहा टाळावा. थोडे दूध चांगले, पण तेही अमर्याद असू नये. दुधातील कॅल्शियममुळे व अमायनो ऍसिडमुळे आम्लाचे प्रमाण वाढू शकते. दूध घेतल्यावर त्यातील “केसीन’ द्रव्यामुळे पोट दुखणे थांबते, परंतु आम्ल निष्प्रभ होण्याचा परिणाम 20 मिनिटेच टिकतो. नव्याने आम्ल तयार होण्याची क्रिया कॅल्शियम व अमायनो ऍसिडसच्या उद्दीपनाने होत राहिल्याने दुधाच्या सेवनानंतर 60 मिनिटांनी जठरातील आम्लाची स्थिती पूर्ववत होते. 150 मिलिलीटर (अर्धा कप) दूध सकाळी, दुपारी आणि रात्री पुरेसे असते. काही व्यक्तींना (अंदाजे 30% भारतीयांना) जास्त दूध पचत नाही, कारण दुधातील लॅक्टोज शर्करा पचविण्यास लागणारे लॅक्टोज नावाचे एन्झाइम आतड्यात कमी तयार होते. त्यामुळे अशा व्यक्तींनी जास्त दूध घेतल्यास लॅक्टोज न पचताच मोठ्या आतड्यात जाते व अपचन होते.
वाटाणा, पावटा, हरभरा, डाळी, उसळी यांच्या सेवनामुळे हायड्रोजन सल्फाइड तयार होतो. मिथेन, अमोनिया व हायड्रोजन सल्फाइड हे वायू सरले नाहीत तर रक्तात शोषले जातात. तेथून ते श्वासोच्छवासाबरोबर बाहेर पडण्याने तोंडाला दुर्गंधी येते. अशा व्यक्तीचे दात, हिरड्या, नाक, घसा यात दोष नसल्यास पचन सुधारणे आवश्यक असते.
आहारात उपरिनिर्दिष्ट डाळी, उसळ, मांसाहार, दूध यांचे प्रमाण कमी करून पालेभाज्या, कोशिंबिरी व फळे यांचे प्रमाण वाढवावे. डाळी व उसळीत ऍटिट्रिपटिक पदार्थ असतात. या पदार्थांमुळे आतड्यात तयार होणाऱ्या ट्रिप्सिन नावाच्या पाचक रसाचे काम होत नाही. परिणामी अर्धवट पचलेले प्रथिनयुक्त अन्न मोठ्या आतड्यात येते. तेथील जिवाणूंमुळे त्याचे विघटन होऊन हायड्रोजन सल्फाइड व अमोनिया गॅस तयार होतो. आहारातील बदल व नियमाने मलविसर्जन होणे यासाठी लागणारे उपाय यांनी हे गॅसेस होत नाहीत.
ढेकर येण्याची क्रिया जठरात वायू साचल्याने होते. आपल्या चोखण्याने व वारा गिळण्यानेच जठरात विकारात अन्न साचून राहू लागले, तर तेथे आंबते व आंबट चव किंवा करपट वास असणारे ढेकर येऊ लागतात. अपचन नसताना येणारे ढेकर केवळ हवा गिळल्याने येतात. ही क्रिया नकळत होत राहते. ही हवा काही प्रमाणात जठरात रहाते., अतिरेक झाल्यास ढेकर येणे अशी क्रिया चालू होते. अशा व्यक्तीला वेळी अवेळी एकामागून एक ढेकर येत राहतात.
आवंढा गिळण्याची क्रिया तोंड पूर्ण बंद झाले तरच होऊ शकते. दातात रूमालची घडी किंवा बाटलीचे बूच धरून ठेवले, तर तोंड बंद होऊ शकत नाही. मग आवंढा गिळला जात नाही. परिणामी ढेकर येणे बंद होते. या तत्कालीक उपायाबरोबर हवा का गिळली जाते, याचा विचार करावा लागतो. याला मनोशारीरिक व्यापारीतील काही घटनांची पार्श्वभूमी त्याला असू शकते.
भूक न लागणे किंवा खा खा सुटणे, पोट दुखणे, गॅसेस होणे, अपचन होणे, ढेकर येणे, शौचास साफ न होणे, मलावरोध, जुलाब, आव, शेम किंवा शौचावाटे रक्त पडणे अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात आढळतात. या साऱ्यांचा संबंध पचनसंस्थेशी आहे. पचनसंस्था म्हणजे मूलत: जठर, लहान आतडे व मोठे आतडे या तीन अवयवांची बनलेली असली तरी तोंडातल्या लाळ तयार करणाऱ्या ग्रंथी, घसा व अन्ननलिका, यकृत, स्वादुपिंड यांचाही समावेश या संस्थेतच होतो. शिवाय या संस्थेचे काम सुरळीत व्हावे, यासाठी मज्जासंस्था व अंतग्रंथी यांचाही विचार पचनसंस्थेत घडत असणाऱ्या घटकांबाबत करावा लागतो.