पुणे – समाज सेवेतून देश सेवा घडवता येते. त्यामुळे पहिल्यांदा समाजाची सेवा करा देश सेवा आपोआप घडेल असे प्रतिपादन युवा उद्योजक व भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त, उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी केले.
वंदेमातरम् संघटना, युवा फिनिक्स सोसायटी युवा वाद्य पथक व श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट यांच्यावतीने स. प. महाविद्यालय येथे अभिनव पुस्तक दहिहंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुनीत बालन यांच्यासह वंदेमातरम संघटनेचे सचिन जामगे, स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील गायकवाड, तुळशीबाग मंडळाचे नितीन पंडित यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
या अभिनव दहिहंडी उपक्रमाचे हे 19 वे वर्ष आहे. पुस्तक दहिहंडीसाठी बालन यांनी आत्तापर्यंत 11 हजार पुस्तकांची मदत केली आहे. पुस्तक दहिहंडीच्या माध्यमातून पुस्तकांचा संग्रह करून गडचिरोली नक्षल भागात तसेच देशाच्या सीमेलगत कारगिल हुंदमान येथील गरजवंत विद्यार्थ्यांना दिली जातात.