बारामतीचे उपनगराध्यक्ष बल्लाळ यांचे प्रतिपादन
बारामती- संविधान निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अहोरात्र कष्ट करून या देशातील शोषित पीडित कामगार शेतकरी कष्टकरी यांना संविधानाच्या माध्यमातून स्वाभिमानाचे जीवन बहाल केले खऱ्या अर्थाने त्यांचे स्वप्न साकार करायचे असेल तर समाज बांधवांनी कर्ज काढून जत्रा व देवदेव करणे बंद करून मुली मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण दिले तरच बाबासाहेबांचे स्वप्न नक्कीच साकार होईल, असे प्रतिपादन बारामतीचे उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ यांनी केले.
बारामती येथे 63व्या धम्मचक्र परिवर्तन दिन, संविधान दिन व बौद्ध समाजाचा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उपनगराध्यक्ष बल्लाळ बोलत होते. यावेळी सुप्रसिद्ध गायक मिलिंद शिंदे यांचा बुद्ध-भीम गीतांच्या कार्यक्रमाला यावेळी हजारोंची उपस्थिती होती.
याप्रसंगी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. संविधानाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, माजी नगरसेवक सुधीर सोनवणे, देवीदास गायकवाड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकिलकर, अशोक आठवले, सचिन सातव, सिद्धनाथ भोकरे, ऍड. सुभाष ढोले, शौकत कोतवाल यांच्यासह नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, माजी उपनगराध्या ज्योती बल्लाळ आदींनी केले. संविधानाबद्दल ऍड. विनोद जावळे, प्रा. डॉ.मिलिंद कांबळे यांनी विवेचन केले. किशोर सोनवणे, पांडूरंग शेलार, सिताराम कांबले, प्रज्ञा बल्लाळ यांनीही यावेळी मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक अजित कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर जगताप यांनी केले.