नाशिक – बेकायदेशीर सरकारचे बेकायदेशीर आदेश पाळू नयेत. या 16 आमदारांना घरी जावे लागणारच. न्यायालयाने यांना उघडे पाडले आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल चढविला आहे. तसेच दाबादाबी चालणार नाही, 90 दिवसांत निर्णय घ्यावाच लागेल, अन्यथा पाहा काय होईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
राऊत पुढे म्हणाले, मिंधे लोक पेढे वाटताय, फटाके वाजवताय. खासदार नाचत आहेत. आमच्याकडे असताना या खासदारांना कधी नाचताना पाहिले नाही. मात्र हे नागडे नाचत होते, सर्वोच्च न्यायलयाने यांचे कपडे उतरवले आहेत. नग्न करुन त्यांना विधानसभा अध्यक्षांकडे पाठवले आहे. भरत गोगावलेचा व्हिप बेकायदेशीर होता. इथेच सरकारचा पराभव झाला आहे.
आता सामान्य माणसालाही कायदा कळतो. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे की, विधिमंडळ पक्ष म्हणजे मूळ पक्ष नव्हे. या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर संपूर्ण सरकार अपात्र होईल. सर्वोच्च न्यायालयानेच यांना अपात्र ठरवले आहे. मात्र आता हे उसणे अवसान आणत आहेत आणि आतून रडत आहेत. सरकारचा अंत जवळ आलेला आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
नार्वेकर घटनात्मक पदावर
राहुल नार्वेकर मुलाखती देत आहेत. त्यात ते म्हणतात, हे माझ्याकडे येणार आहे, मीच ते पाहिल. ते अशा मुलाखती देऊ शकत नाही. नार्वेकर घटनात्मक पदावर आहेत. त्यांनी आत्तापर्यंत अनेक पक्ष बदललेले आहेत. त्यांना स्थैर्य नाही. नार्वेकरांना सर्वोच्च न्यायलयाच्या निवाड्यानुसारच न्याय करावा लागेल.
तसेच काल एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे चुकीचे विश्लेषण केले. याला बेशरमपणा म्हणतात. हे थांबायला हवे. लोकशाहीचा डंका मिरवणारे पंतप्रधान जगाला काय तोंड दाखवणार? अशी टिकाही त्यांनी यावेळी केली.