शिर्डी – राज्यातील सर्वांत श्रीमंत असलेल्या साई संस्थानने भाविकांना दोन हजार रुपयांच्या नोटा 30 सप्टेंबरनंतर दानपेटीत टाकू नये, असे आवाहन केले आहे. शुक्रवारी रिझर्व्ह बॅंकेने भारतीय चलनात असणाऱ्या दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर करताच एकच खळबळ उडाली आहे.
अनेक नागरिकांचे गैरसमज, तर दुसरीकडे अफवांना पेव फुटले असून, दोन हजार रुपयांच्या नोटा नेमकी कोणत्या कारणामुळे चलनातून बाद केल्या आहेत याची सविस्तर माहिती जाहीर झाली नसल्याने देशभरात आर्थिक व्यवहारात मोठे संकट उभे राहिले आहे. अर्थात या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत प्रत्येक बॅंकेत जमा करून त्याबदल्यात त्या रकमेच्या इतर नोटा घेण्याची सुविधा नागरिकांना असणार आहे.
सन 2016मध्ये ज्यावेळी अचानक भारतीय चलनातील 1000 व 500 च्या नोटा बाद करण्याचा निर्णय झाला होता, त्या वेळी सर्वसामान्य नागरिकांचे अतोनात हाल झाले होते. अनेकांकडे ब्लॅकमनी म्हणून साठविलेल्या या नोटांची विल्हेवाट लावण्यासाठी जाळण्याची नामुष्की आली होती, तर काहीजणांनी अनेक तीर्थक्षेत्राच्या मंदिरात असणाऱ्या दानपेटीत या बाद झालेल्या नोटा टाकल्या होत्या.
शिर्डीच्या साईसमाधी मंदिरातील अनेक दानपेटीत कोट्यवधींच्या 1000 व 500 रुपयांच्या नोटा जमा झाल्या होत्या. मात्र, त्या नोटा स्वीकारण्याची मुदत संपूनही अनेक भाविकांनी गुप्तदान म्हणून या बाद झालेल्या नोटा टाकल्या होत्या. अशा कोट्यवधींच्या चलनातून बाद झालेल्या नोटांची विल्हेवाट कशी लावायची हा मोठा प्रश्न साई संस्थान प्रशासनासमोर उभा राहिला होता. मात्र, या वेळी 2000 हजारच्या नोटा चलनातून बाद जरी झाल्या असल्या, तरी त्या सर्व बॅंकेतून बदलून त्या बदल्यात इतर नोटा मिळणार आहे. मात्र, शिर्डीत येणाऱ्या भाविकांनी 30 सप्टेंबरनंतर दानपेटीत 2000 च्या नोटा टाकू नये असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर यांनी केलं आहे.
काही दिवसांपूर्वी कोट्यवधी रुपयांचे चलनात असणारे 1,2, 5, 10 व वीस रुपयांचे नाणे स्वीकारण्यास अनेक बॅंकांनी विरोध केला होता. मात्र, त्यावर तोडगा काढण्यास साई संस्थानला यश मिळालं असलं, तरी यावेळी 2000 रुपयांच्या नोटा बाद झाल्याने व दानशूर भाविकांचा गैरसमज टाळण्यासाठी प्रत्येक भाषेत साई संस्थांनच्या संकेत स्थळावर व मंदिर परिसरात मोठी जाहिरात करून फलक लावण्याची आवश्यकता आहे. दि. 30 सप्टेंबरपर्यंत शिर्डीत येणाऱ्या देशातील अनेक भाविकांना समजून सांगण्यासाठी मोठा त्रास होणार आहे हे नाकारून चालणार नाही.
बाद नोटांचा तीर्थक्षेत्रांना फायदा!
भारतीय चलनातील 2000 रुपयांच्या नोटा बाद झाल्या असल्या, तरी त्याचा फायदा अनेक तीर्थक्षेत्राला होणार आहे. अनेक भाविक गुप्तदान म्हणून दानपेटीत श्रद्धेने टाकत असतात. मात्र, त्या कालावधीत संस्थानच्या तिजोरीत मोठी वाढ होते हे सन 2016च्या निर्णयाच्या अनुभवावरून म्हणता येईल.