वालचंदनगर-संचारबंदी लागू असतानाही कोणी विनाकारण दुचाकी घेऊन रस्त्यावर फिरत असेल, तर कायदेशीर कारवाई करण्याबरोबर, दुचाकीही लॉकडाऊन काळ संपेपर्यंत जप्त करण्याचा आदेश पुणे जिल्ह्य ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिले आहेत. अत्यावश्यक सेवा आणि अतिमहत्वाच्या कामांसाठी बाहेर पडलेल्यांना या कारवाईतून वगळण्यात आले आहे.
आदेश मिळाल्यापासून वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी कडक कारवाई करणास सुरूवात केली. अवघ्या 24 तासांत बुधवार दुपारपासून गुरुवारी दुपारपर्यंत वालचंदनगर जंक्शन चौक परिसरात दुचाकी तीन व चार चाकी गाडी जप्त केल्या. दुचाकीवर फिरणाऱ्या आठ अधिक जणांवर गुन्हे दाखल केल्याचे व ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवून गुन्हा दाखल होणार असल्याचे दिलीप पवार यांनी सांगितले. बारामती-इंदापूर वालचंदनगर- भिगवण या चार प्रमुख रस्त्यावर दुचाकींची वर्दळ वाढली आहे. आवाहन करूनही नागरिक रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
- पोलीस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, रस्त्यांवरील गर्दी दिवसेंदिवस वाढत असल्याने विनाकारण फिरणाऱ्यांची दुचाकी जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी संपूर्ण जिल्ह्यात होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपापल्या ठाण्याच्या हद्दीत वरील कारवाई काटेकोरपणे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्वच प्रमुख रस्ते व गावागावांतील चौक अशा ठिकाणी पोलिसांचे पथक तैनात केले आहे.
-संदीप पाटील, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण