नवी दिल्ली – एक षटकार खेळाडूचे किंवा संघाचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे स्वप्न पूर्ण करु शकतो, तो षटकार महेंद्रसिंग धोनीने आजच्याच दिवशी 2011 साली फटकावला व 28 वर्षांनी भारतीयांचे विश्वकरंडक पुन्हा एकदा मिळविण्याचे स्वप्न साकार झाले. या क्षणाला सोशल मीडियावर उजाळा मिळाला, कौतुक कर्णधार धोनीचे झाले. मात्र, त्यामुळे गौतम गंभीरने नेटकऱ्यांवर आपला संताप व्यक्त केला. हा विजय केवळ एका खेळाडूमुळे नव्हे तर संपूर्ण संघ व सपोर्ट स्टाफच्या एकत्रीत प्रयत्नांमुळे मिळाल्याचे ट्विटही गंभीरने केले.
आजच्याच दिवशी म्हणजे 2 एप्रिल 2011 रोजी भारतीय संघाने एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडकावर आपले नाव कोरले होते. भारतीय क्रिकेटची पंढरी समजली जात असलेल्या मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर या स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात झाला. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत 274 धावा केल्या होत्या. माहेला जयवर्धनेने 103 धावांची खेळी केली. भारतीय संघाने पहिल्याच षटकापासून श्रीलंकेच्या गोलंदाजीवर हल्ला चढविला.
सलामीवीर गौतम गंभीर व सचिन तेंडुलकरने वर्चस्व राखले होते. सचिन बाद झाल्यानंतरही गंभीरने 97 धावांची स्वप्नवत खेळी केली. त्याचे शतक हुकले आणि पुन्हा एकदा चाहत्यांना हुरहुर वाटू लागली. मात्र, या स्पर्धेत सातत्याने धावा करणारा युवराज मैदानात आला त्याला साथ देण्यासाठी धोनीही मैदानात उतरला आणि पुन्हा एकदा श्रीलंकेच्या गोलंदाजीची धार बोथट झाली. धोनीनेही जबाबदारीने फलंदाजी करत 91 धावांची खेळी केली. सामन्यावर आता भारतीय संघाचे वर्चस्व निर्माण झाले होते.
अखेरच्या 11 चेंडूत भारताला विजयासाठी केवळ चार धावांची गरज होती. धोनीने त्यावेळी नुवान कुलसेकराच्या चेंडूवर उत्तुंग षटकार खेचला व त्याचवेळी भारतात मुहुर्ताच्या आधीच दिवाळी साजरी होण्यास सुरवात झाली. याच षटकाराबद्दल धोनीचे कौतुक आजच्या दिवशी बरोबर 9 वर्षांनी करत नेटकऱ्यांनी या आठवणींना उजाळा दिला. मात्र, काही महिन्यांपूर्वी गंभीरनेच धोनीवर टीका केली होती. आजही त्याने त्याचा पुनरुच्चार केला.
धोनीने शतक जवळ आल्याची आठवण केली नसती तर माझे शतक पूर्ण झाले असते असे त्यावेळी गंभीर म्हणाला होता. आजही त्याने नेटकऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. हा विश्वकरंडक विजय एकट्या धोनीमुळे नाही तर सर्व संघाच्या तसेच सपोर्ट स्टाफच्या सांघिक प्रयत्नांमुळे मिळाला असे सांगून गंभीरने पुन्हा एकदा आपल्या हुकलेल्या शतकाला जबाबदार धरत धोनीला लक्ष्य केले.