आळंदी – माउलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान ज्येष्ठ वद्य अष्टमीला म्हणजेच दि. 13 जून रोजी न करता थेट आषाढ शुद्ध दशमीला दि. 30 जून रोजी करून यंदाची आषाढी वारी अवघ्या 20 वैष्णवांसमवेत पार पाडण्याची लेखी सूचना आळंदीतील नागरिकांनी आळंदी देवस्थानला शनिवारी (दि. 9) केली आहे. नागरिकांच्या सह्यांचे निवेदन देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे-पाटील यांना देण्यात आले आहे.
करोनामुळे राज्यातील पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूरातही करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातच आळंदीच्या वेशीवर चऱ्होली बुद्रुक, मोशी आणि दिघीतही करोनाचे रूग्ण सध्या आढळले. हा करोनाचा परिणाम पाहता आळंदीतील आषाढी वारी भरेल की नाही याबाबत सध्या अनेकांना शंका आहे. त्यातच आळंदी देवस्थानने आषाढी वारीबाबतचा सोहळा यंदाच्या वर्षी कशा स्वरूपात पार पाडावा याबाबत दिंडीकरी फडकरी वारकऱ्यांकडून सूचना मागविल्या.
याबाबत फडकरीर, दिंडीकरी यांच्यासोबत आळंदी देवस्थानची व्हिडीओ कॉन्फरन्सही पार पडली. त्या अनुषंगाने आळंदीकर ग्रामस्थांनीही सुरक्षेच्या कारणास्तव आणि करोनाचा प्रादुर्भाव वारी काळात वारकऱ्यांना होवू, नये यासाठी देवस्थानला निवेदन दिले.
निवेदनात नमूद केले आहे की…
यंदाच्या वर्षीचा सोहळा अत्यंत साधेपणाने आणि शासनाच्या नियमांना अधिन राहून पार पाडावा. वारीचा ऐतिहासिक सोहळा असल्याने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा होणे अपेक्षित आहे. देशातील सध्याची आपत्कालीन व्यवस्था पाहता माउलींचा आषाढी वारी सोहळा हा 15 ते 20 व्यक्तींच्याच व्हावा.
यामध्ये पालखी सोहळा मालक, प्रमुख विश्वस्त, पालखी सोहळाप्रमुख, चोपदार, मानकरी, शिपाई, दिंडीकरी, विणेकरी, टाळकरी, पखवाज्या, झेंडेकरी, तुळस घेणारी महिला वारकरी,आणि पुजारी अशा मोजक्याच लोकांना बरोबर घेवून सोहळा व्हावा. आषाढ शुद्ध दशमीला 30 जून रोजी सकाळी सहा वाजता माउलींचे मंदिरातून साधेपणाने पंढरपूरकडे प्रस्थान करावे.
माउलींच्या पादुका ट्रकमधे अथवा सजवलेल्या रथात ठेवाव्यात. सोहळा वाटेत कोठेही न थांबवता थेट पंढरपूरला न्यावा. शासनाच्या नियमानुसार एकादशीला(दि. 1 जुलै) प्रदक्षिणा, द्वादशीचे पारणे फेडून पुन्हा आळंदीकडे प्रयाण करावे, असे या निवेदनात नमूद केले आहे