नगर -करोनामुळे निर्माण झालेल्या आणिबाणीच्या परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने केले आहे. यंदा खरीप व रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध होण्यासाठी बॅंकेने अनेक सवलतींचा वर्षाव केला आहे. आता शेतकऱ्यांना वैयक्तीक हमीपत्रावर तसेच इतर बॅंका व पतसंस्थांचे पीककर्ज वगळून अन्य कर्ज असले तरी पीककर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दोन्ही हंगामांतील पिकांसाठी देण्यात येणाऱ्या कर्जाच्या रकमेत देखील वाढ करण्यात आल्याची माहिती जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी दिली.
नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी विविध निर्णय घेण्यात आले. शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी तातडीने पीककर्ज उपलब्ध देण्यात येणार आहे. करोनामुळे शेतकऱ्यांना तलाठी व इतर शासकीय कार्यालये बंद असल्याने कर्ज मागणीसाठी सात-बारा, 8 अ व इतर कागदपत्रे उपलब्ध होण्यास अडचणी होत्या. त्यासंबंधी बॅंकेने तातडीने निर्णय घेऊन कर्जदार सभासद वैयक्तीक हमीपत्रावर कर्ज पुरवठा सुरू केलेला आहे. जे शेतकरी इतर बॅंका अथवा पतसंस्थांकडून घेतलेले कर्ज परतफेड करू शकले नाहीत, अशा शेतकऱ्यांकडील पीककर्ज वगळून इतर कर्जाची बाकी असल्यास जिल्हा बॅंकेमार्फत पीककर्ज तातडीने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसे आदेशही परिपत्रकाद्वारे बॅंकेच्या शाखांना देण्यात आलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांचे सात-बारा व 8 अ उतारे संयुक्त आहेत, अशा शेतकऱ्यांनाही वैयक्तिक हमीपत्रावर पीककर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मध्यम मुदत व दीर्घ मुदत कर्ज असले, तरी बॅंकेने अशाही शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. पीककर्जाची मर्यादा देखील वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मागील हंगामाच्या खरीप- रब्बी पीक कर्जदरात वाढ करुन ती सन 2020-21 मध्ये खरीप-रब्बी भुसार पिकासाठी एकरी जास्तीत जास्त 20 हजार, ऊस कर्ज एकरी जास्तीत जास्त 50 हजार व डाळिंब पिकासाठी एकरी 60 हजार पीककर्जाची मर्यादा वाढविण्यात आली आहे. वाढीव कर्ज दरानुसार जिल्ह्यातील सेवा सोसायट्यांकडून प्रस्ताव मागविण्यात येऊन त्यास तत्काळ मंजुरी देण्याचे सांगण्यात आले आहे.
करोना संकटाच्या परिस्थितीतही जिल्हा बॅंक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. बॅंकेने खरीप हंगामात आज अखेर 695 कोटींचे कर्ज वितरण केले आहे. जिल्ह्यातील इतर सार्वजनिक व खासगी बॅंकांचा विचार करता खरीप पीक कर्ज एकूण वाटपापैकी 80 ते 85 टक्के खरीप पीककर्ज वाटप एकट्या जिल्हा बॅंकेने केले आहे.
केंद्र शासन व नाबार्ड यांच्या आदेशानुसार 1 एप्रिलपासून रूपे किसान क्रेडिट कार्ड आधारे कर्ज घेणाऱ्या कर्जदार शेतकऱ्यांनाच व्याज सवलत व इतर लाभ प्राप्त होणार आहेत. यामध्ये केंद्र शासनाचे व महाराष्ट्र शासनाचे येणारे व्याज थेट कर्जदार सभासदाच्या खाती जमा होणार असल्याने प्राथमिक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व्याज वसूल करत आहेत. रूपे. के. सी. सी.द्वारे शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज उपलब्ध होत नसल्याने यावर्षासाठी शेतकऱ्यांची अडचण होऊ नये, म्हणून बॅंकेने मंजुरीच्या आठ टक्के कर्ज प्रचलित पध्दतीने उपलब्ध करुन देण्याचा निर्णयही संचालक मंडळाने घेतला आहे. तसेच रूपे के. सी. सी. कार्ड वापरणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाखापर्यंत विमा कवच प्राप्त होणार आहे. याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन गायकर, शिवाजीराव कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे व बॅंकेच्या संचालक मंडळाने केले आहे.