मंचर- करोनाच्या पार्श्वभूमीवर बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होऊ नये, यासाठी आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघ मंचर आणि तालुका कृषी अधिकारी घोडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्याच्या दुर्गम आदिवासी गावातील शेतकऱ्यांना मागणीनुसार बांधावर भात बियाणे उपलब्ध करून दिले आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष भगवान वाघ यांनी दिली.
शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा वाटप योजनेची सुरवात झाली आहे.
या योजनेअंतर्गत दुर्गम भागातील गावांतील शेतकरी गटातील अध्यक्ष व सचिव यांच्या समवेत कृषी सहाय्यक यांनी चर्चा करून शेतकऱ्यांनी बियाणांची मागणी नोंदवली. नोंदवलेल्या बियाणांच्या मागणीनुसार आंबेगाव खरेदी विक्री संघाने डिंभे शाखा येथून 104 शेतकऱ्यांना 16 क्विंटल 50 किलो इंद्रायणी भाताचे बियाणे बांधावर पोहोच केले असून, यासाठी होणारा सर्व खर्च संघाने केला आहे. अडीवरे, पंचाळे, माळीण, आमडे, असाणे, पिंपरगणे व नानवडे या गावांमध्ये हे वाटप करण्यात आले असून यासाठी तालुका कृषी अधिकारी टी. के. चौधरी, पंचायत समिती कृषी अधिकारी मनोज कोल्हे, सहाय्यक कृषी अधिकारी व्ही. एम. तळपे, यू. आर. लोहकरे, डी. व्ही. सुपे यांनी सहकार्य केले.
बियाणे वाटप करतेवेळी संघाचे माजी अध्यक्ष मधुकर बोऱ्हाडे, संचालक सुभाष गेंगजे, बबन मोहरे उपस्थित होते. भात उत्पादक बंधूंनी प्रत्येक गावातील कृषी सहाय्यकांकडे आपली नावनोंदणी करून संघातून बियाणे खरेदी करावे, असे आवाहन संघाचे उपाध्यक्ष रामनाथ बांगर व संचालक मंडळाने केले आहे.