सातारा -जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि खातेप्रमुखांच्या झालेल्या आढावा बैठकीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्या कारभारावर पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता एककली कारभार चालल्याचा आरोप करत पदाधिकाऱ्यांनी धोत्रे यांना खडेबोल सुनावले. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी याप्रकरणी मध्यस्ती करत पदाधिकारी आणि अधिकारी समन्वय राहिला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. सोनाली पोळ, समाजकल्याण सभापती सौ. कल्पना खाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, अविनाश फडतरे, मनोज ससे यांच्यासह खातेप्रमुखांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करुन सविस्तर आढावा घेण्यात आला. करोना उपाययोजनांबाबत आरोग्य विभाग चांगले काम करत असून बाधितांची संख्या घटली असली तरी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सुचना यावेळी करण्यात आल्या.
बांधकाम विभागाच्या आढाव्यादरम्यान उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार होत असल्याचा आरोप त्यांनी केला. अध्यक्ष उदय कबुले यांनीही पदाधिकाऱ्यांना डावलण्यात येत असल्याची तक्रार केली. आम्ही अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून काम करत आहे, मात्र अधिकारी पदाधिकाऱ्यांशी समन्वय ठेवत नाहीत ही बाब योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून कोण काम करत असेल तर ते कदापी सहन केले जाणार नसल्याचे कबुले यांनी स्पष्ट केले.
पदाधिकारी म्हणणे मांडत असतानाच संतोष धोत्रे यांनी त्यांची बाजू सावरुन घेण्याचा प्रयत्न केला. पदाधिकाऱ्यांना डावलून काम केले नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पदाधिकारी आणि धोत्रे यांच्यात चर्चा सुरु असताना विनय गौडा यांनी संतोष धोत्रे यांना थांबण्याच्या सुचना केल्या. तुमचे काय म्हणणे आहे ते नंतर सांगा असे गौडा यांनी त्यांना सांगितले.
पदाधिकाऱ्यांना डावलून घेतलेले निर्णय रद्द करण्यात येतील
अनेक कामात संतोष धोत्रे पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. विनय गौडा यांनी पदाधिकारी – अधिकारी समन्वय राहिला पाहिजे अशी भूमिका घेत पदाधिकाऱ्यांना डावलून जर काही निर्णय झाले असतील तर ते रद्द करण्यात येतील, असे बैठकीदरम्यान सांगितले. बऱ्याच दिवसानंतर पदाधिकारी-अधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात चर्चिली जात होती.