पणजी – गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग फसल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. गोव्यात कॉंग्रेसला 40 पैकी 45 जागा मिळतील असे त्यांना वाटते. त्यामुळेच कॉंग्रेस आघाडी करण्यास इच्छूक नसावी, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
कॉंग्रेसचे माहीत नाही, पण शिवसेना आणि एनसीपी गोव्यात एकत्र आहेत. कॉंग्रेससाठी आम्ही प्रयत्न केला. त्यांच्यासोबत चर्चा केली. पण पैकीच्या पैकी जागा त्यांना गोव्यात मिळू शकतात असे त्यांना वाटते. इतका आत्मविश्वास एखाद्या पक्षाला असेल तर आपण त्यांच्या आत्मविश्वासाला कशाला तडा द्यायचा? त्यांनी 40 पैकी 45 जागा जिंकल्या तरी हरकत नाही, असा चिमटा राऊत यांनी काढला.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशी माझी चर्चा झाली. स्थानिक स्तरावरही चर्चा झाली. दिगंबर कामत, दिनेश गुंडूराव, गिरीश तोडणकर यांच्याशी चर्चा केली. त्यांचा सकारात्मक सूर असला तरी जागा वाटपाच्यावेळी त्यांच्या अडचणी येतात. आम्हाला दोन-तीन जागा देण्याचा प्रस्ताव त्यांनी नक्कीच ठेवला होता. आमची चर्चा झालीच नाही.
चर्चेतून काहीच निष्पन्न झाले नाही असे मी म्हणणार नाही. चर्चा झाली. आम्हाला त्यांनी काही जागा देण्याचा प्रस्ताव दिला होता. पण आमच्यासोबत राष्ट्रवादीही आहे. त्यांचाही विचार व्हायला पाहिजे. महाविकास आघाडी जेव्हा आपण बोलतो तेव्हा केवळ शिवसेना राहत नाही. राष्ट्रवादी आहे. त्यांना कोणत्या जागा हव्यात, ते कोणत्या जागांवर लढू इच्छितात यावर चर्चा होणे गरजेचे आहे. ती होऊ शकली नाही. त्याच्यामुळे आम्ही कॉंग्रेसला शुभेच्छा दिल्या, असे ते म्हणाले.
आम्ही दहा जागांवर समाधानी होतो
ज्या जागा राष्ट्रवादीला हव्या होत्या त्या सोडायला कॉंग्रेस तयार नाही. कॉंग्रेस गोव्यातील मोठा पक्ष आहे. कॉंग्रेस अनेक वर्ष सत्ताधारी पक्ष होता. मागच्यावेळी त्यांना सर्वाधिक जागा मिळाल्या. 17 आमदार त्यांचे निवडून आले होते. आता त्यांच्याकडे दोन तीन आमदार राहिले आहेत. त्यांना वाटतं लोकांचा पाठिंबा अजून त्यांना आहे. असेल तर दिसेल.