औरंगाबाद- कौटुंबिक वाद असह्य झाल्यामुळे पतीविरोधात पोलिसात तक्रार दाखल करायला गेलेल्या प्राध्यापिकेचे दोन वर्षांचे बाळच हिसकावून घेतल्याचा प्रकार औरंगाबादेत घडला. या अमानवी प्रकारामुळे व्याकुळ झालेल्या मातेने खूप विनवण्या करूनही तिचे बाळ तिला परत देण्यात आले नाही. अखेर शहरातील भरोसा सेल गाठत बाळ मिळवून देण्यासाठी मदत मागितील. त्यानुसार दामिनी पथकाने हस्तक्षेप करत सदर महिलेला धीर देत तिची आणि बाळाची भेट घडवून आणली.
मुकुंदवाडी परिसरातील उच्चशिक्षित दाम्पत्याच्या घरात घडलेला हा प्रकार. अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेली सदर महिला आणि तिचा पती या दोहोंमध्ये गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरु होते.
वादाला कंटाळून प्राध्यापिकेने पतीच्या विरोधात भरोसा सेलकडे तक्रार दिली होती. या प्रकारामुळे संतापलेल्या पतीने दोन वर्षाचे बाळच महिलेकडून हिसकावून घेतले. अनेक दिवस मातेकडे बाळाला दिलेच नाही.
गुरुवारी सदर महिलेने भरोसा सेलकडे या प्रकाराची माहिती दिली. मागील 20 दिवसापासून बाळाची आणि तिची भेट होऊ दिली नाही, ही माहिती कानावर घातली. त्यानंतर त्यांनी तिला मदत करत दिलासा दिला.