पणजी – गोव्यातील सर्वसामान्य लोकांना प्रस्थापितांविरूद्ध आम्ही उभे करू. गोव्यातील राजकारण हे प्रस्थापितांच्या हाती गेलेले आहे. गोव्यातील सत्ता ही भूमाफिया, भ्रष्टाचारी, ड्रग्ज माफिया यांच्या हातात आहे. आणि ते गोव्याचं भविष्य ठरवतात. हे जर मोडायचं असेल, तर गोवेकरांनी आपल्यातील सामान्य लोकांना निवडणुकीत मतदान करावे आणि निवडून आणावे, असे आवाहन शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केले.
गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधत शिवसेनची भूमिका स्पष्ट केली. संजय राऊत म्हणाले, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची तर महाराष्ट्रातही आघाडी आहे, कॉंग्रेसही आमच्यासोबत आहे. परंतु, गोव्यात त्यांची जागा वाटपासंदर्भात काही मजबुरी असेल, आमची चर्चा देखील चांगली सुरू होती, मात्र आघाडी होऊ शकली नाही. राष्ट्रवादीची देखील त्यांच्याशी चर्चा फिस्कटली. तर याचा अर्थ असा नाही की आम्ही निवडणूक लढणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
याचबरोबर, गोव्याचं राजकारण जर तुम्ही पाहिलं. तर मोजके दहा-बारा लोकच गोव्याचं राजकारण करतात. तेच कधी या पक्षात असतात तर कधी त्या पक्षात असतात. त्यामध्ये मोठ्याप्रमाणावर भूमाफिया, ड्रग्ज माफिया आहेत.
भाजपात अशातच जे लोक गेलेले आहेत, ज्यांचा संबंध ड्रग्ज माफियांशी आहे आणि हे सर्वांना माहिती आहे. आम्हाला असं वाटतं की गोव्याच्या जनतेने यंदा अशा लोकांना निवडून द्यावं, जे सामान्य व्यक्ती आहेत, असे ते म्हणाले.