न्यूयॉर्क : तणाव आणि चिंता यांचा मानवी शरीरावर अनिष्ट परिणाम होतो, हे आरोग्य विज्ञानाने सिद्ध केले असले तरी आता हा तणाव माणसाचे केस पांढरे होण्यालाही कारणीभूत असतो ही गोष्ट समोर आली आहे. अमेरिकेत झालेल्या एका संशोधनात हा निष्कर्ष काढण्यात आला असून जर माणूस तणावमुक्त झाला तर त्याचे पांढरे केस पुन्हा काळे होऊ लागतात असेही त्यांनी म्हटले आहे.
कोलंबिया युनिव्हर्सिटीतील इर्विन मेडिकल सेंटरने हे संशोधन केले असून त्यांनी आपल्या संशोधनात हे सर्व दावे केले आहेत. तणाव आणि चिंता यामुळे माणसाचे केस पांढरे होतात हा निष्कर्ष प्रथमच अशाप्रकारे संशोधनातून समोर आला आहे. या संशोधनाचे प्रमुख पिलार्ड यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मानवी केसांमध्ये जैविक इतिहास लपलेला असतो त्यामुळे मानवी मनातील तणाव आणि चिंता याचा थेट परिणाम या केसांवर होतो.
केस केवळ पांढरे होतात असेच नव्हे तर केसांचे आरोग्यही बिघडू शकते. केस राठ होणे किंवा केस गळणे हे सुद्धा विकार तणावामुळे होऊ शकतात. वय वाढत असताना जेव्हा माणसाचे केस पांढरे होत असतात, तेव्हा जी प्रक्रिया होते त्याचा अभ्यास करून त्यावर आधारित हे सर्व निष्कर्ष काढण्यात आले आहेत.
पिलार्ड यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे केसांच्या रंगासाठी प्रोटीन जबाबदार असतात या प्रोटीनचे प्रमाण कमी जास्त झाले कि केसांचा रंग बदलू लागतो. या संशोधनामध्ये 14 स्वयंसेवकानावर प्रयोग करण्यात आले. तेव्हा जो एक स्वयंसेवक जेव्हा सुट्टी घेऊन आराम करत होता तेव्हा त्याचे केस पुन्हा काळे झाल्याचे निदर्शनास आले. अकाली केस पांढरे झालेल्यांसाठी हा विषय असू शकतो. ज्यांचे केस वयोमानामुळे पांढरे झाले आहेत त्यांचे केस तणावमुक्तीमुळे पुन्हा काळे होणे शक्य नाही असेही संशोधकांनी सुचवले आहे.