मानवप्राणी हा इतर सर्व प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. अनेक बाबतीत. आणि आहाराबाबत तर अधिकच. इतर कोणताही प्राणी शिजवलेले, तयार केलेले अन्न खात नाही. ठरावीक वेळेवर इतर कोणाही प्राण्याला अन्न मिळत नाही. त्या दृष्टीने मानव प्राणी खरोखरच एकमेवाद्वितीय आहे.
कधीकाऴी रानटी अवस्थेत असताना त्याला चुकून आगीत भाजलेले मांस वा तत्सम काही अन्न मिळाले असेल आणि त्याला भाजलेले, शिजवलेले अन्न अधिक चविष्ट लागते, सहजपणे पचते याचा शोध लागला असेल आणि त्यात दिवसेदिवस प्रगतीच होत गेली. आगीवर अन्न शिजवण्यापासून ते आता मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये अन्न शिजवण्यापर्यंत प्रगती झालेली आहे. अन्न पदार्थांचे तर असंख्य प्रकार झालेले आहेत आणि त्यात नवनवीन प्रकारांची भर पडत आहे.
आता चुली कालबाह्य झाल्या असल्या, तरा चुलीवर शिजवलेले अन्न खाण्याची फॅशन आली आहे. रस्त्याने जाताना खास चुलीवर शिजवलेले भोजन अशा जाहिराती पाहायला मिळतात, त्यामागे हेच कारण असावे. मात्र एक गोष्ट नक्की आहे, की जलद, अतिउष्ण आंचेवर शिजवलेल्या अन्नापेक्षा मंद आंचेवर शिजवलेल्या अन्नाची वेगळीच चव असते. त्यासाठी सोलर कुकर हे अतिशय उपयुक्त आहेत. सोयीचे आहेत आणि पर्यावरणाच्या दृष्टीनेही सर्वोत्तम आहेत.
मंद आंचेवर अन्न शिजणं ह्यात एक गंमत असते. अन्नाचा दर्जा आणि चव त्यात राखली जाते. सोलर कुकर हे त्याचे खरोखर उत्तम उदाहरण आहे. सूर्यच तुमच्यासाठी थेट अन्न शिजवून तयार करतो त्यात. सूर्य चूल अथवा सोलर कुकरमध्ये वेगवेगळी अनेक मॉडेल्स आहेत. ती घरी सुद्धा बनवता येतात आणि नीट नियोजन केले, तर उन्हाळ्यात तरी दोन्ही वेळचा बराच स्वयंपाक त्यात उत्तम प्रकारे होऊ शकतो. घरी लक्ष द्यायला कोणी नसेल, तरी किमान एक वेळचा स्वयंपाक तरी त्यात होऊच शकतो. त्याला जरा वेळ लागतो, पण त्यातील पदार्थांची चव अप्रतिम असते. ह्या वेळ जाण्यामुळे सूर्यचूल प्रॅक्टिकल आहे की नाही, हा वेगळा मुद्दा होऊ शकेल; पण ते अन्न वेगळ्या चवीचं असतं हे नक्की.
इंडक्शन कुकरमध्ये तापमान थेट समोरच दिसत राहते. तापमानाशी स्पेसिफिक असं खेळता येतं त्यात. ठरावीक अन्नपदार्थ ठरावीक तपमानाला शिजवता येतात. त्यातही कमी तपमानाला शिजलेली गोष्ट आणि अनावश्यक जास्त तपमानाला शिजलेली गोष्ट ह्यातला फरक जाणकाराला कळू शकतो.
आता मूळ मुद्द्यावर येऊ. लोक वरचेवर चायनीज खात असतात रस्त्यावर. त्यात कोणते पदार्थ, कोणते सॉसेस वापरतात चटकन माहीत नसते. एकदम मोठ्या भांड्यात आणि अतिशय जास्त फ्लेमवर ते क्षणात काढून, चमचमीत करून पुढ्यात येतं. शिजायला काहीच वेळ दिलेला नसतो. मोठ्या लोखंडी कढईत कढईची म्हणून जी काय मजा उतरत असेल, तिच्यावर सगळा खेळ असतो. अशी कढई घरी आणून असंच काम केलं, तर निदान त्यातल्या घटक पदार्थांची, स्वच्छतेची खात्री तरी वाटेल. अर्थात, ते ही बाळगणं सोपं नाही.
चीनमध्ये जे अन्न पूर्वापार शिजवलं जातं, ते ही मंद आचेवर शिजवलं जातं, असं म्हणतात. भारतातल्या चायनीज पदार्थांचा चीनशी केवळ नाममात्र संबंध आहे. तर महत्त्वाची गोष्ट ही, की मंद आचेवर अन्न शिजणे ह्यात खरी गंमत आहे. तितका पैस मात्र आपल्या जगण्यात नाहीये.
घराघरांत स्त्रियांवर अन्न शिजवायची संपूर्ण जबाबदारी ढकलून देणं बरोबर नाही. आहार सजगता पुरुषाने स्वयंपाक घरात जाऊन स्त्रीचा कामाचा भार हलका करण्यापासून सुरू होते. त्यात आवडी निवडीचा फारसा प्रश्नच येत नाही. जगण्यासाठी आवश्यक स्किल्स सर्वांना थोडी फार तरी आलीच पाहिजेत. त्यानंतर येणारे आहार सजगता, हेल्दी फूड वगैरे मुद्दे अंगी नीट बाणवता येतात.