सातारा – काही दिवसांपूर्वीच मद्यधुंद समाजकंटकांच्या टोळीने सातारा येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या बाहेर असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांची तोडफोड केली होती. या प्रकरणी काही युवकांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
आता या गाड्यांवर पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने कारवाई केली. अजिंक्य कॉलनीकडून ऑफिसर्स क्लबकडे जाणारा रस्ता सोमवारी मोकळा करण्यात आला. शहरात बोकाळलेल्या अतिक्रमणांच्या विरोधात कारवाई करण्याचे संकेत मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिले आहेत.
येथील सदरबझार परिसरात असलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कुंपण भिंतीला खेटून लावण्यात आलेल्या टपऱ्या व खाद्यपदार्थांचे गाडे कित्येक वर्षे वादाला आमंत्रण देणाऱ्या ठरल्या आहेत. या अतिक्रमणांना नेहमीच राजकीय वरदहस्त लाभला आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दररोज जिल्ह्यातील हजारो वाहनचालक, वाहनधारक आपल्या कामांसाठी येतात. या कार्यालयाच्या बाहेरच वडापाव, चायनीज खाद्यपदार्थ, चहाचे गाडे व टपऱ्या उभारण्यात आल्या होत्या. या गाड्यांमुळे परिसरात वाहतूक कोंडी नित्याचीच ठरली होती.
काही दिवसांपूर्वी मद्यपान केलेल्या समाजकंटकांच्या टोळक्याने काही दिवसांपूर्वी या परिसरातील खाद्यपदार्थांच्या काही गाड्यांचे नुकसान केले होते. या घटनेची प्रसिद्धीमाध्यमांनी चांगलीच दखल घेतली होती. या तोडफोडीप्रकरणी पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला होता. या अनधिकृत गाड्या लावणाऱ्यांना कोणाचा राजकीय वरदहस्त आहे, असा प्रश्न उपस्थित झाला होता.
त्यामुळे या अतिक्रमणांची गांभीर्याने दखल घेऊन पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळी कारवाई करून अतिक्रमणे हटवली. अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख प्रशांत निकम व दहा कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. या कारवाईनंतर अतिक्रमणांच्या जागेवर पुन्हा चर खोदण्यात आले आहेत.