मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सूरत येथील हिरे व्यापार संकुलाचे उद्घाटन करण्यात आले. सुरत शहराजवळील खजोद गावात ६७ लाख चौरस फूट पेक्षा जास्त बांधकाम क्षेत्रफळ असलेले हे जगातील सर्वात मोठे हिरे व्यापार संकुल आहे असा दावा केला जात आहे. मात्र आता यावरून राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत टीका केली आहे. “पंतप्रधानांच्या हस्ते आज सुरतमध्ये जगातल्या सर्वात मोठ्या ‘डायमंड बोर्स’चं उद्घाटन झालं. याबद्दल गुजरात सरकारचं अभिनंदन करावं की मुंबईतला हिरे व्यवसाय आपल्या डोळ्यादेखत पळवला गेला याचं दुःख व्यक्त करावं हेच समजेनासं झालंय” अशी खंत रोहित पवार यांनी व्यक्त केली.
रोहित पवार पुढे म्हणाले,”मुंबईतला हिरे व्यवसाय संपवून सुरतच्या हिरे व्यवसायाला ताकद दिली जात असताना आपले सत्ताधारी आपल्या खुर्च्या टिकवण्यासाठी केवळ बघ्याची भूमिका घेत राहिले. खुर्चीचा विषय असला तर दिल्लीला पन्नास चकरा मारता, दिल्लीचे पाय धरता आणि महाराष्ट्राच्या हिताचा विषय असतो तेंव्हा मात्र बिळात लपून बसता, हाच का तुमचा मराठी बाणा आणि हाच का तुमचा स्वाभिमान? असा सवाल देखील रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.
“भाजपसाठी आणि त्यांच्या दोन्ही सहकाऱ्यांसाठी केवळ सत्ता महत्वाची आहे का ? महाराष्ट्राच्या अस्मितेची तुमच्या लेखी काही किंमत नाही का ? अजून काय काय गहाण टाकणार ? किमान महाराष्ट्रासाठी थोडा तरी स्वाभिमान दाखवा” असं देखील रोहित पवार यावेळी म्हणाले.
पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते आज सुरतमध्ये जगातल्या सर्वात मोठ्या ‘डायमंड बोर्स’चं उद्घाटन झालं. याबद्दल गुजरात सरकारचं अभिनंदन करावं की मुंबईतला हिरे व्यवसाय आपल्या डोळ्यादेखत पळवला गेला याचं दुःख व्यक्त करावं हेच समजेनासं झालंय..
मुंबईतला हिरे व्यवसाय संपवून सुरतच्या हिरे… pic.twitter.com/oAu9uRNsVq
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 17, 2023
कस आहे गुजरातच हिरे व्यापारी संकुल
हे संकुल कच्चे हिरे आणि पॉलिश्ड हिरे तसेच दागिन्यांच्या व्यापारासाठचे सर्वात मोठे जागतिक केंद्र आहे. यामध्ये आयात आणि निर्यातीसाठी अत्याधुनिक ‘कस्टम क्लिअरन्स हाऊस’, किरकोळ दागिन्यांच्या व्यवसायासाठी ज्वेलरी मॉल, आंतरराष्ट्रीय बँकिंगची सुविधा आणि सुरक्षित तिजोरी सुविधा यांचा समावेश असेल. या मार्केटचे माध्यम संयोजक दिनेश नावडिया यांनी अलीकडेच एका निवेदनात म्हटले आहे की, अनेक हिरे व्यापार्यांनी,या संकुलातील त्यांची कार्यालये आधीच ताब्यात घेतली आहेत, जी लिलावानंतर वितरीत करण्यात आली आहेत. मुंबईतील हिरे व्यापाऱ्यांना येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे.