नवी दिल्ली – भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ऑस्ट्रेलियात होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघात हवाच, असे मत फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने व्यक्त केले आहे.
विश्वकरंडकासारख्या महत्वाच्या स्पर्धेत धोनीसारखा अनुभवी खेळाडू संघात असेल तर नवोदित खेळाडूंना सरस कामगिरीची प्रेरणा मिळते. धोनीचा अनुभव अफाट आहे. त्याचे खेळातील ज्ञान सर्वोत्तम आहे. तो केवळ माजी कर्णधार म्हणून नव्हे तर एक चाणाक्ष खेळाडू आहे. प्रतिस्पर्धी संघातील प्रमुख फलंदाजांचे कमकुवत दुवे हेरण्याचे त्याचे कसब अविश्वसनिय आहे, त्यामुळेच तो संघात असेल तर विजेतेपदाची संधी जास्त असेल, असेही तो म्हणाला.
धोनी फिनिशर आहे, तो संघात असणेच समोरील संघासाठी त्रासदायक असते. कारण सामन्याच्या कोणत्याही क्षणी तो सामन्याला कलाटणी देऊ शकतो. संघातील गोलंदाजांशी सातत्याने चर्चा करणे, त्यांना मार्गदर्शन करणे तसेच त्यांना अपयशाच्या निराशाजनक मानसिकतेतून बाहेर काढणे यात धोनी माहिर आहे, असेही कुलदीप म्हणाला.
गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यात धोनीच्या संथ फलंदाजीवर देखील खूप टीका झाली होती. त्याने या स्पर्धेनंतर विश्रांती घेतली होती. त्याच्या जागी विविध यष्टिरक्षकांना खेळविण्यात आले होते मात्र, त्यातील एकालाही धोनीच्या जागी अव्वल कामगिरी करता आली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा धोनीवरच चर्चा सुरु झाली. तो निवृत्ती घेणार की पुनरागमन करणार असे प्रश्न विचारले जाऊ लागले.
त्यातच निवड समिती व मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याला आयपीएलमध्ये कामगिरी व तंदुरुस्ती सिद्ध कर तरच संघ निवडीत तुझा विचार केला जाईल असे सांगितले होते. त्याप्रामणे त्याने आपल्या चेन्नई सुपरकिंग संघाच्या सराव सत्रात सहभागही घेतला होता. मात्र, करोनाच्या धोक्यामुळे हे सराव सत्र बंद झाले. आता आयपीएल कधी होणार व धोनीला कोणत्या निकषाद्वारे संघात निवडले जाणार हा देखील एक प्रश्न निर्माण झाला आहे.