बहुजनांच्या शिक्षणाचा, विकासाचा ध्यास घेत अखेरच्या श्वासापर्यंत कार्यमग्न राहिलेल्या महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव, प्रसिद्ध वक्ते डॉ. विकास आबनावे यांचा
आज (16 जुलै 2021) प्रथम स्मृतिदिन. त्यानिमित्त…
संत तुकोबांचा अभंग प्रसिद्ध आहे, “आम्ही वैकुंठवासी, आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी, साच भावे वर्ताया।’ वैकुंठ ही प्रज्ञावंत मनाची प्रशांत अवस्था आहे. मानवीय अस्तित्वाने ती मिळवायची असते. जेव्हा जगातील सर्व सुखे हात जोडून उभी असतात, तेव्हा त्यांना दूर सारून आपल्या सभोवतालच्या दुःखी जणांना दिलासा देत, त्यांच्या जीवनातील “कुंठा’ दूर करण्याचा प्रयत्न म्हणजेच वैकुंठाची वारी होय!
डॉ. विकास आबनावे यांनी धन्वंतरीचा व्यवसाय निवडला. “प्रकृति धर्मा’ची कास धरून जीवनाचा सत्कार केला. आपल्या मनातील करुणेचा सर्वांना साक्षात्कार घडवला. अत्यंत लीनतेने आयुष्याचा स्वीकार केला. त्याच हिमतीने ते व्याधीशी झुंजले आणि अनंतात विलीन झाले. एक अविश्वसनीय, अकल्पनीय निर्वाण झाले.
अत्यंत अभ्यासू आणि प्रज्ञावंत
डॉ. विकास आबनावे यांचा अनेक विषयांवर अभ्यास होता. एखाद्या विषयाचा ध्यास घेतल्यावर त्यात संपूर्णपणे झोकून देण्याची त्यांची प्रवृत्ती होती. विशेषतः त्यांनी नाथ संप्रदायाच्या गूढ वाटणाऱ्या रहस्यमयी तत्त्वज्ञानाची विचारपूर्वक मांडणी करून समग्र विश्वाला ऊर्जा देणारी त्यांची क्षमता प्रकट करून आपल्या आध्यात्मिक उत्तुंगतेचा परिचय घडवला होता. पॅरिस येथील विद्वत्सभेतील त्यांचे भाषण, किरगीजस्थान येथील त्यांचे दर्शन आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे भूषण ठरले आहे.
महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळ
डॉ. आबनावे यांची मातृसंस्था त्यांच्या पित्यांनी, बंधूद्वयांनी सांभाळली. गरीब मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ज्ञानाचे दालन खुले केले. त्यांचा ममतेने सांभाळ केला. हजारो विद्यार्थी शिकून-सवरून मोठे झाले. आपापल्या क्षेत्रांत त्यांनी आपल्या कर्तृत्वाचे झेंडे रोवले. डॉ. आबनावे यांनी संस्थेचा हा वारसा अत्यंत समर्थपणे सांभाळला.
एखाद्या विषयाचा पाठपुरावा करून त्याची प्राप्ती करायची ठरवली तर त्यासाठी ते अत्यंत बारकाईने शिस्तबद्ध योजना आखीत. एकदा बारामतीच्या शाळेच्या परवानगीसाठी त्यांनी मला मंत्रालयात पाठविले. त्यावेळचे शिक्षण मंत्री नवाब मलिक यांच्या दालनापाशी मी पोचताच संस्थेचे कार्यकर्ते तिथे उभे होते. मी नवाब मलिक यांना भेटलो.
त्यांनी त्यावर सही केली. तो कागद सचिवांच्या खोलीत जाण्याआधीच तिथे त्यांचे बंधू होते. त्यावरील अभिप्राय पाहून त्यांनी लगेच फोन केला. सगळ्या गोष्टी अगदी जिथल्या तिथे झाल्या. डॉ. आबनावे यांच्या योजकतेनेही थक्क झालो. गोरगरिबांच्या संस्थेचे कार्य किती निष्ठेने केले जाते, हे मला कळले. त्यांनी आपल्या संस्थेचा विस्तार केला. प्रसाद आबनावे यांचा सेवाहस्त त्यांच्या नेहमी बरोबर होता.
महनीय विद्वानांचा सन्मान
आपल्या देशाची खरी ओळख ऋषी, ज्ञानर्षी आणि महर्षी यांच्यामुळे आहे. हेच खरे आपले संचित आहे, असा संदेश डॉ. आबनावे यांनी त्यांच्या पुढच्या पिढीला दिला आहे. त्यांनी आपला संसार, मुले-बाळे, सर्वकाही व्यवस्थित ठेवले. “प्रथमेश’च्या विवाहाचे भव्य आयोजन असो किंवा गौरवला लंडनला पाठवून त्याचे सुयोग्य शिक्षण असो, त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली आहे. संस्थेच्या प्रगतीसाठी चांगला वारसा ठेवला आहे.
ज्या समाजातून ते आले त्यांच्यासाठी राजमार्ग निर्माण करण्याचे कार्य केले आहे. मोहनदादा जोशी यांचे खरेखुरे मैत्र जिवापाड जपणारे नेते त्यांच्या कार्याची धुरा वाहत आहेत. राजकारणाची अद्ययावत माहिती ते ठेवीत. त्यांनी सम्राट अशोकावर लिहिलेले आधुनिक चिंतन वाचून शरद पवार यांनीदेखील त्यांचे कौतुक केले. “नित्शे’पासून “ओशो’पर्यंत त्यांची गवसणी चालू असे!
वक्तृत्वाचा हुकमी एक्का
डॉ. विकास आबनावे यांचे वक्तृत्व अत्यंत मर्मग्राही, हृदयस्पर्शी आणि तात्त्विक विचारसरणीने भरलेले असे. वैज्ञानिकांची सभा असो की साहित्य संस्कृतीची शोभा किंवा कॉंग्रेसची जनसभा असो, विकास आबनावे मंचावर येताच श्रोते भारावून जात असत. दिल्लीच्या डॉ. राजेंद्र प्रसाद सभागृहात त्यांचे हिंदी वक्तृत्व ऐकून देशभराच्या विविध प्रांतातून आलेले श्रोते मंत्रमुग्ध झाले.
बाबू जगजीवन राम यांच्या कन्या मीरा कुमार यांच्या चेहऱ्यावरील कौतुक पाहून खरोखरच त्यांच्यावर देश पातळीची जबाबदारी सोपविण्यात येईल, अशी मनोमन खात्री वाटत असे. लोकसभेच्या माजी सभापती मीरा कुमार डॉ. आबनावेंना आपला धाकटा बंधू मानीत असत.
आपल्या परिवारातील एक घटक म्हणून त्यांच्याकडे आपुलकीने पाहत असत. त्यांचे चिरंजीव स्वतः पुण्याला आले तेव्हा सर्व कामे सोडून ते डॉ. आबनावे यांची संस्था पाहायला गेले. थोरामोठ्यांचा सन्मान करून त्यांचा सदैव आदर करणारे डॉ. आबनावे आपल्या वाणीने सर्वप्रिय होते.
आलो याच कारणासी!
हिंदीचे महान कवी मलिक मुहम्मद जायसी म्हणतात, माणूस म्हणजे काय? “मानुस पेम असे वैकुंठी । नही त कह छार एकमुठी.’ मराठीत त्याचा अनुवाद असा –
प्रीति मानवा स्वर्गीय करते
त्याविण केवळ माती उरते!
माणूस माणसाशी प्रेम करतो, म्हणून तो वैकुंठवासी असतो. नाहीतर तो फक्त मूठभर राख होऊन जातो. आपल्या मुठीतून ज्यांनी असंख्य ज्ञानरत्नांचा वर्षाव केला, अशा डॉ. विकास आबनावे यांच्या स्मृतीला अभिवादन करताना विनम्रतेने मान झुकते, पापण्या ओलावतात!
प्रा. रतनलाल सोनग्रा