जिल्ह्यातील विविध प्रकल्प मार्गी लागण्याचा विश्वास
पुणे – जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वकांक्षी असलेले पुरंदर विमानतळ, पुणे-नाशिक ग्रीन कॉरिडोर, रिंगरोड यांसारख्या प्रकल्पांना गती देण्यासाठी दर आठवड्याला आपण बैठक घेणार आहोत, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
महसूल दिनानिमित्त आयोजित महसूल सप्ताहाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ये म्हणाले की, पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे झाले आहे.
पंतप्रधानांशीही बोलणे झाले. त्यावर “दिल्लीत आल्यानंतर बोलू,’ असे त्यांनी सांगितले आहे. तर पुरंदर विमानतळाच्या जागेवरून वाद आहेत. पुणे शहराला आंतराष्ट्रीय विमानतळाची आवश्यकता आहे. त्यामुळे हे काम लवकर सुरू होणे गरजेचे आहे. गेले वर्षभर मी विरोधी पक्षात होतो. आज दुपारीच मला या गोष्टींवर बोलायचे होते. परंतु पंतप्रधानांच्या कार्यक्रमात वेळ कमी होता.
या निमित्ताने पुणेकरांना मी आश्वासित करू इच्छितो, की पुणे शहराच्या दृष्टीने जे जे प्रकल्प महत्वाचे आहेत, ते मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.’ “पुणे-नाशिक रेल्वेसाठी तिन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना निधी पाठविला आहे. रिंगरोडच्या भूसंपादनासाठी निधी दिला आहे. मेट्रो प्रकल्प सुरू झाला असला, सार्वजिनक वाहतूक सक्षम करण्यासाठी पीएमपी बसेससाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.
पाणीप्रश्नावरही केली चर्चा
शेती आणि पुण्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, अशा अनेक विषयांवर महापालिका, पीएमआरडीए आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी मी आजच चर्चा केली आहे,’ अशी माहिती पवार यांनी दिली.
माझ्याकडे अधिकार आहेत…
पालकमंत्री पदाबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले, “सुदैवाने मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे अर्थखाते दिले आहे. मी उपमुख्यमंत्रीसुद्धा आहे. त्यामुळे मला बैठका घेण्याचा अधिकार आहे. प्रकल्पांचा आढावा घेण्याचादेखील अधिकार आहे. अर्थमंत्री म्हणून निधी वाटपाचे अधिकारदेखील मला आहेत. त्यामुळे या सर्व प्रकल्पांना बळ मिळाल्याचे तुम्हाला लवकरच दिसेल,’ असे म्हणत अजितदादांनी अधिक भाष्य टाळले.