कर्जत : कर्जत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लॉकडाऊन विरोधात तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्ववत सुरू करावी, या मागणीसाठी बुधवारी कर्जत आगारात “डफली बजाओ’ आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष दीपक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाला निवेदन देण्यात आले.
या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की 25 मार्चपासून करोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभर अनेक उपाययोजना करण्यात आल्या.
सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली. ऑफिस, दुकाने, हॉटेल, मार्केट आदी ज्यामुळे लोकांचा आपापसातील संपर्क कमी होईल, अशा प्रकारे सर्व व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आले. या चार महिन्यांतील करोनाच्या प्रसाराचा अभ्यास केल्यानंतर करोनाच्या प्रसाराचा पॅटर्न लक्षात घेऊन करोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.
गरीब व हातावर पोट असलेल्या बहुसंख्य लोकसंख्येचा रोजगार व एकूणच उद्योग व्यवसाय व अर्थ व्यवहार तातडीने सुरू करण्याची आवश्यकता आहे. करोना विरुद्ध लढण्याची प्रतिकार क्षमता अंदाजे 80 टक्के लोकांनी दाखवली आहे. 15 टक्के लोक वैद्यकीय उपचाराला प्रतिसाद देऊन करोनाचा मुकाबला करण्यात यशस्वी झाले आहेत.
एसटी, बेस्ट व सर्व शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा सरकारने त्वरीत सुरू कराव्यात, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करीत आहेत. गणपती उत्सवासाठी खासगी बस वाहतुकीचे बुकींग सुरुवात झाले आहे. खासगी सेवा चालू होत असतील, तर सरकारने वाहतूक सेवा सुरू करण्यात काय अडचण आहे? सरकारने एसटी व “बेस्ट’च्या सेवा तुरळक प्रमाणात सुरू केल्या आहेत; परंतु त्या फारच अपुऱ्या आहेत.
सार्वजनिक वाहतूक सेवेअभावी लोकांची अतिशय गैरसोय होत आहे. दुसरे म्हणजे सध्या घातलेली जिल्हा बंदीही ताबडतोब उठवावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन व्यवस्थापक, कर्जत बस डेपो यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले. यावेळेस सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी डफली वाजवून आंदोलन केले.
या आंदोलनात वंचित जिल्हा पदाधिकारी हरिश्चंद्र यादव, सुनील गायकवाड, अनिल गवळे, तालुका अध्यक्ष धर्मेंद्र मोरे, युवा अध्यक्ष प्रदीप ढोले, सरचिटणीस राहुल गायकवाड, ललित हिरे, शहर पदाधिकारी लोकेश यादव, भारतीय बौद्ध महासभेचे कमलाकर जाधव, अशोक कदम, अनिकेत गायकवाड, सुनील वाघमारे तसेच आदी कार्यकर्ते उपस्थित होते.