मुंबई – महाराष्ट्रातील आठ सहकारी बॅंकासह देशातील 17 अडचणीत आलेल्या सहकारी बॅंकातील पात्र ठेवीदारांना डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कार्पोरेशन ऑक्टोबर महिन्यामध्ये ठेवीचे पैसे परत करणार आहे. अडचणीत असलेल्या या 17 बॅंकावर रिझर्व्ह बॅंकेने बरेच निर्बंध घातले आहेत. त्यामध्ये पैसे काढून घेण्यावर मर्यादाचा समावेश आहे. त्यामुळे या बॅंकांचे ठेवीदार अडचणीत आले आहेत.
या बॅंकेतील ठेवीवर डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कार्पोरेशन कडून पाच लाखापर्यंतच्या ठेवीचा विमा उतरविण्यात आला आहे. 17 बॅंकांमध्ये महाराष्ट्रातील आठ बॅंक आहेत. उत्तर प्रदेशातील चार कर्नाटकातील दोन, दिल्ली, आंध्र प्रदेश व पश्चिम बंगालमधील प्रत्येकी एक बॅंक आहे.
महाराष्ट्रातील बॅंकांमध्ये साहेबराव देशमुख को-ऑपरेटिव्ह बॅंक, सांगली सहकारी बॅंक, रायगड सहकारी बॅंक, नाशिक जिल्हा गिरणा सहकारी बॅंक, साईबाबा जनता सहकारी बॅंक ,अंजनगाव सुरजी नगरी सहकारी बॅंक, जयप्रकाश नारायण नागरी सहकारी बॅंक आणि करमाळा अर्बन सहकारी बॅंकेचा समावेश आहे.
यासंदर्भात कार्पोरेशनने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की, पात्र ठेवीदारांनी लेखी पुराव्यासह यासंदर्भात माहिती जमा करणे अपेक्षित आहे. त्यांना पाच लाखापर्यंतची नुकसान भरपाई मिळेल. त्यासाठी त्यांनी पर्यायी बॅंक खाते नंबर देण्याची गरज आहे. त्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. देशातील बहुतांश बॅंक खात्यातील पाच लाख रुपयांपर्यंतचा रकमेचा विमा उतरविण्यात आलेला आहे. बॅंकींग व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास वाढवा याकरिता हा विमा उत्तराविण्यात येतो.