नवी दिल्ली – नोटबंदीचा निर्णय घेऊन मोदींनी देशाचे अर्थकारण बिघडवून टाकले आहे. जगातल्या अर्थकारणातील नोटबंदीचा निर्णय हा सर्वात घातक निर्णय होता अशी टीका कॉंग्रेसने केली आहे. मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाला आज पाच वर्ष पुर्ण झाली. त्यानिमीत्त कॉंग्रेसने ही टीका केली आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यसभेतील कॉंग्रेसचे नेते मल्लिकार्जून खरगे यांनी एक व्हिडीओ संदेश जारी केला असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, नोटबंदीच्या निर्णयामुळे भारताची एक चांगली अर्थव्यवस्था पुर्ण उद्धवस्त झाली. बेरोजगारी वाढली, छोटे व्यवसाय बंद झाले, सर्वसामान्यांना या निर्णयाचा मोठा फटका बसला.
नोटबंदीचा एकही उद्देश सार्थ ठरला नाही असेही त्यांनी म्हटले आहे. नोटबंदीने दहशतवाद कमी होणार होता, काळापैसा नाहींसा होणार होता पण यातले काहीही झाले नाही उलट त्यातून लोकांच्या नोकऱ्या गेल्या, देशाचा जीडीपी घसरला, लोकांचे उत्पन्न कमी झाले असे ते म्हणाले. नोटबंदीमुळे लाभ झालेला एक तरी इसम या देशात सापडेल काय असा सवालही कॉंग्रेसने उपस्थित केला आहे.
व्यवहारात रोखीचे प्रमाण कमी व्हावे असाही एक सरकारचा उद्देश होता पण नोटबंदी नंतर व्यवहारातील रोखीचे प्रमाण कमी व्हायच्या ऐवजी वाढलेलेच दिसून आले असून आज देशातील व्यवहारात 28 लाख कोटी रूपयांच्या चलनी नोटा फिरत आहेत असेही खरगे यांनी म्हटले आहे.
जयराम रमेश यांनी म्हटले आहे की या निर्णयामुळे देशाचा आर्थिक कणाच मोडून काढला गेला आहे. कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही हा विनाशकारी निर्णय होता असे म्हटले आहे. या निर्णयामुळे ना भ्रष्टाचार कमी झाला ना काळापैसा परत आला असेही त्यांनी म्हटले आहे.