शंकर दुपारगुडे
शहरातील रुग्णालये झाली हाऊसफुल्ल : नगरपालिकेकडून उपाययोजनांकडे होत आहे दुर्लक्
लहान मुले जास्त प्रभावित
पाच महिने, पाच वर्षे ते 14 वर्षांतील मुले सर्वांत जास्त आजारी आहेत. त्यातील काही रुग्ण डेंग्यूसदृश आजाराचे असल्याचे आढळून आले आहेत. शहरात वाढलेल्या डासांचे प्रमाण याला कारणीभूत असल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल अजमेर यांनी सांगितले.डेंग्यूने एकाचा मृत्यू
गजानननगर येथील जागवर उमेर खान (23 वर्ष) या युवकास डेंग्यूसदृश आजाराची लक्षणे दिसून आली होती. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती खालावल्याने दुसऱ्या रुग्णालयात त्यास दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. त्यास डेंग्यू असल्याचे त्याच्या रक्ताच्या तपासणी अहवालातून समोर आल्याचे समजते.
कोपरगाव – कोपरगाव तालुक्यात डेंग्यूसदृश आजाराने थैमान घातले आहे. कोपरगाव शहरासह तालुक्यातील रुग्णालये रुग्णांनी खचाखच भरले आहेत. त्यांना दाखल करण्यासाठी रुग्णालयातील बेड कमी पडत आहेत. त्यामुळे रुग्णालयांना हाऊसफुल्लचे बोर्ड लावण्याची वेळ आली आहे. एकाच कुटुंबातील अनेक जण थंडी-तापाने फणफणत आहेत. वाढलेले डासांचे प्रमाण या रोगराईला कारणीभूत ठरत असल्याची माहिती वैद्यकीय विभागाने दिली आहे.
कोपरगाव शहराला भर पावसाळ्यामध्ये आठ दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. पिण्याच्या पाण्याचा साठा तसेच वापरण्यासाठी लागणारे पाणी नागरिक वेगवेगळ्या टाक्यांमधून साठवत आहेत. डेंग्यू डासांची उत्पत्ती याच पाण्यात होत आहे. त्यामुळे डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण वाढले आहेत. शहरात दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या डेंग्यूच्या थैमानाने नागरिक मेटाकुटीला आले आहेत.
शहरात मोठ्या प्रमाणात डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोपरगाव नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने त्वरित लक्ष देऊन डास निर्मूलनाचे काम गतिमान करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. शहरामध्ये औषध फवारणी होणे अपेक्षित आहे. ती वेळेवर न झाल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. भर पावसाळ्यामध्ये आठ दिवसांआड पाणीपुरवठा केल्याने साठवलेल्या पाण्यातून रोगराईला आमंत्रण देण्याचे काम पालिकेच्या वतीने सुरू आहे. पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांना इच्छा नसतानाही पाणी साठवण्याची वेळ आली आहे. मात्र पालिका प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याचे दिसते.
शहरात थातूर-मातूर औषध फवारणी करत डास निर्मूलनाचे काम सुरू आहे. एका बाजूला मुख्य रस्त्यावर फलक लावून नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, अशा आशयाचा संदेश दिला जातो. परंतु प्रत्यक्ष रोगराई निर्मूलन करण्यासाठी किंवा डासाची उत्पत्ती कमी होण्यासाठी पालिका प्रशासनात अपेक्षित प्रयत्न करीत नसल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
जुलै महिन्यामध्ये तब्बल दीडशे रुग्ण डेंग्यूसदृश आजारावर उपचार घेतल्याचे पुढे आले आहे. ताप, उलटी, अंग दुखणे, डोळे दुखणे, खाज येणे, जेवण कमी होणे, अंगावर पुरळ येणे, शरीरातल्या पेशी कमी होणे आदी लक्षणे डेंगूसदृश रुग्णांमध्ये आढळून येतात. त्यामुळे नागरिकांनी दिवसा चावणाऱ्या डासांपासून सुरक्षितता घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. कुंदन गायकवाड यांनी केले आहे. डेंग्यूसदृश डास हे दाट लोकवस्ती, स्वच्छ पाण्याच्या टाक्या, पडक्या इमारती, आदी ठिकाणी आढळून येतात. डेंग्यूच्या डासास जास्त उंचीवर उडत येत नसल्याने तो जास्तकरून पायांना चावतो, अशी माहिती डॉक्टर संदीप मुरूमकर यांनी दिली आहे.
जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने कोपरगाव शहरासह तालुक्यात डेंग्यू सदृश्य आजारांच्या अनुषंगाने असलेल्या डासांची पाहणी केली असता, शहरातील टिळकनगर, लक्ष्मीनगर, गजानननगर, खडकी, दत्तनगर, गोरोबानगर, संजयनगर, सुभाषनगर या झोपडपट्टी भागातील दाट लोकवस्तीत डेंग्यूचे डास सर्वाधिक आढळून आल्याची माहिती आरोग्य सहाय्यक एस. ए. जोशी यांनी दिली. ते म्हणाले, कोपरगाव नगरपालिकेने डास निर्मूलनासाठी अपेक्षित यंत्रणा योग्य प्रकारे न वापरल्यामुळे तसेच धूर फवारणीची पद्धत चुकीची वापरल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे.
बरेच दिवस साठवून ठेवलेल्या पाण्यामध्ये रात्रीच्या वेळी डास अंडी घालतात ज्या पाण्यामध्ये अंडी घातली आहे ते पाणी नागरिक फेकून देण्याच्या ऐवजी आठ दिवस वापरतात त्यामुळे डासाच्या उत्पत्तीचे प्रमाण वाढले आहे. आरोग्य विभागाचे पथक त्या भागातील डेंग्यूसदृश्य अळ्या असलेले पाणी फेकून देण्याची विनंती केली असता नागरिक आरोग्य पथकाला सहकार्य करत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.