पाटणा – पेगॅसस हेरगिरी प्रकरणात चौकशी होऊन सगळ्या गोष्टी लोकांपुढे येणे गरजेचे आहे, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी म्हटले आहे. पेगॅसस प्रकरणात त्यांनी विरोधकांच्या सुरात सूर मिळवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नितीशकुमार यांचा पक्ष भाजपप्रणित एनडीए आघाडीचा पक्ष आहे. या प्रकरणात विरोधकांच्या मागणीशी सहमती दर्शवणारे नितीशकुमार हे घटक पक्षांचे पहिले नेते ठरले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, लोकांना त्रास देण्यासाठी अशा प्रकारची हेरगिरी करणे योग्य नाही. या बाबतीत जे काही घडले आहे ते लोकांपुढे आले पाहिजे, असे त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.
या प्रकरणाचा तपास होण्याची गरज आहे काय, असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला असता असा तपास अगदीच गरजेचा आहे, असे उत्तर नितीशकुमार यांनी दिले. या प्रकरणाचा प्रत्येक अँगल तपासला जाण्याची गरज असून, सर्व बाबी लोकांपुढे आणल्या गेल्या पाहिजेत, असेही नितीशकुमार यांनी म्हटले आहे.