कोलकाता – पश्चिम बंगाल सरकारने आपल्या राज्यात मेट्रो व लोकल रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी रेल्वे बोर्डाकडे केली आहे. या सेवा सुरू करण्यासाठी ज्या लॉजिस्टीक्सची गरज आहे त्यांनाहीं अनुमती देण्याची मागणी त्या सरकारने केली आहे.
राज्याचे गृह सचिव अल्पन बंडोपाध्याय यांनी तसे पत्र रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांकडे पाठवले आहे. राज्यात मेट्रो रेल्वे सेवा पुर्ण स्वरूपात आणि लोकल रेल्वे सेवा 25 टक्के इतक्या प्रमाणात सुरू करावी अशी सूचना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
तथापि ही सेवा कधीपासून सुरू करावी याची तारीख मात्र या पत्रात देण्यात आलेली नाही. त्यावर रेल्वे बोर्डाने अजून कोणतीही भूमिका घेतलेली नाही. करोनाच्या लॉकडाऊनच्या काळापासून या राज्यातीलही लोकल व मेट्रो सेवा बंद आहे. त्यामुळे लोकाना स्थानिक प्रवासाची मोठीच अडचण सहन करावी लागत आहे.